प्रतिनिधी/ वडूज
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा जाणता राजा असा उल्लेख करण्यावर भाजपा नेते आणि छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे असेही ते यावेळी म्हणाले.
पडळ (ता. खटाव) येथील खटाव- माण साखर कारखान्याच्या 251001 व्या साखर पोत्याचे पूजन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरद पवारांनी उदयनराजेंच्या टीकेला उत्तर दिलं. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. आ. प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीपराव येळगावकर, प्रभाकर देशमुख, डॉ. तानाजीराव चोरगे, सतीशराव सावंत, रणजितसिंह देशमुख, अनिलभाऊ देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सुरेंद्र गुडगे, प्रा. बंडा गोडसे, नंदकुमार मोरे, सत्यजितसिंह पाटणकर, विजय काळे यांची प्रमुख उपस्थती होती.
यावेळी शरद पवार म्हणाले, “मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास त्यांना जाणता राजा असं कुठेही संबोधण्यात आलेलं नाही. जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला. रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नव्हते. राजमाता जिजाऊ या त्यांच्या गुरु होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते ही लेखणीची कमाल आहे. छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे,’’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
साखर उद्योगाबाबत बोलताना पवार म्हणाले, गेल्या दोन वर्षात जगामध्ये साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात साखरेला चांगला भाव मिळणार आहे. साखरेबरोबर इथेनॉल, वीज व इतर उपउत्पादने घेतल्यास व्यवसाय तोटय़ात येणार नाही. त्यातच आवश्यक तेव्हढी नोकरभरती व इतर तांत्रिक बाबीचे काटेकोरपणे पालन केल्याने खटाव-माण कारखान्याला चांगले दिवस येतील. या भागाला आणखी पाणी देण्याच्या उद्देशाने मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, डॉ. येळगावकर व इतर सहकार्यासमवेत नजीकच्या काळात बैठक लावली जाईल.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, ऊस पीक हे जास्त पाण्यावर येणारे पीक आहे. जिह्यात असणाऱया धरणातील पाणीसाठय़ाला मर्यादा आहे. या पाणीसाठय़ाचा विचार करुन शेतकऱयांनी ऊस पीक ठिबक सिंचनाद्वारे घ्यावे. ऊस पीक हे शाश्वत उत्पादन देणारे पीक आहे. या पिकाला पर्याय आता शोधला पाहिजे, असेही ते म्हणाले.
प्रभाकर घार्गे यांनी भाषणात खटाव- माणच्या शेतकऱयांची कुचंबणा होऊ नये यासाठीच धाडसाने कारखान्याची निर्मिती केल्याचे सांगितले. तर मनोज घोरपडे यांनी कारखान्याच्या प्रगतिसंदर्भात सविस्तर तांत्रिक माहिती दिली. पवार साहेबांसारख्या अभ्यासू माणसाचे पाय कारखान्याला लागल्याने संचालक मंडळ धन्य झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रदीप विधाते यांनी सहकार, औद्यकिरण व राजकारणाची सुयोग्य सांगड घालणाऱया घार्गे साहेबांना पक्षाने बळ देण्याची मागणी केली.
संचालक नंदकुमार मोरे यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. अर्जुनराव खाडे, सी. एम. पाटील, विक्रम घोरपडे, भास्करशेठ चव्हाण, सोनाली पोळ, शशिकला देशमुख, इंदिरा घार्गे, कविता म्हेत्रे, सुभाष शिंदे, बाळासाहेब सोळस्कर, राजूशेठ भोसले, महेश घार्गे, आनंदराव भोंडवे, बबनराव कदम, रविंद्र सानप, डॉ. प्रकाश पाटोळे, भाग्यश्री भाग्यवंत आदीसह सर्व संचालक, सभासद व शेतकरी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.