उत्तर प्रदेशमधील उमेदवार निवडीसाठी काँग्रेसकडून समितीची घोषणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने छाननी समितीची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याची घोषणा केली. राजस्थानमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र सिंह यांची या समितीच्या अध्यक्षस्थानी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच समितीमध्ये इतर दोन सदस्य असून त्यात हरियाणाचे दीपेंद्र हुडा आणि महाराष्ट्रातील मंत्री वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारी प्रियांका गांधी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय लल्लू आणि आराधना मिश्रा यांच्यासह सर्व सचिव उमेदवारांच्या निवडीसाठी छाननी करतील.
पुढील वर्षीच्या प्रारंभी उत्तर प्रदेशमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेसने राज्यात प्रतिज्ञा यात्रा काढण्याची देखील घोषणा केली आहे. निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वसामान्य लोकांसोबतचा संपर्क वाढवण्यासाठी घरोघरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियंका गांधी यांनी पदाधिकाऱयांशी चर्चा सुरू केल्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून तब्बल 12 हजार किलोमीटर इतका लांबचा प्रवास केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.