प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे फोटोग्राफी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. आधीच अत्याधुनिक मोबाईलमुळे या व्यवसायावर परिणाम झाला असताना आता लॉकडाऊनमुळे छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर यांच्या समस्येत भर पडली आहे. सध्या अत्याधुनिक पद्धतीचे ऍण्ड्रॉईड फोन आल्याने छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पूर्वी सण, समारंभ, कार्यक्रम, विविध सोहळय़ांमध्ये छायाचित्रकारांची गरज भासत होती. मात्र आता सर्वांच्याच हातात ऍण्ड्रॉईड फोन असल्याने गरज कमी झाली आहे. याचा फटका या व्यवसायावर अवलंबून असणाऱया असंख्य छायाचित्रकारांना बसत आहे. यंदाचा लग्नाचा सिझनही पूर्णपणे रिकामा जाण्याची चिन्हे दिसत आहे. असे मत बेळगाव फोटोग्राफर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष मोहन कोपर्डे यांनी तरुण भारत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर 2019 मध्येही लग्नसमारंभाची संख्या कमीच होती. यामुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील लग्न समारंभाची कामे मिळतील या आशेवर छायाचित्रकार होते. मात्र लॉकडाऊनमुळे पूर्ण सिझन जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असंख्य छायाचित्रकारांनी कर्ज काढून फोटो स्टुडिओ उभारले आहेत. तसेच व्यवसायासाठीही कर्ज घेतले आहेत. मात्र सुमारे सहा महिन्यापासून त्यांना काम नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. मार्च ते जून महिना आमच्यासाठी कामाचा असतो. तर उर्वरित 5 – 6 महिने लहान मोठय़ा कामावर भागवावे लागते. सध्या लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचा संकेत मिळत असल्याने हा सिझन पूर्णपणे रिकामा जाण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे छाया चित्रकारांना पुढील दिवसात आणखी कठिण परिस्थितीना सामोरे जावे लागणार आहे. असे मोहन कोपर्डे म्हणाले.
छायाचित्रकारांच्या विविध मागण्या आणि समस्यांबाबत 2016 मध्ये संपूर्ण राज्यातील छायाचित्रकारांनी एक दिवस काम बंद आंदोलन छेडले होते. तसेच सरकारला मागण्यांचे निवेदनही दिले होते. मात्र आजपर्यंत सरकारने छायाचित्रकारांच्या मागण्यांची दखल घेतली नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक जिल्हा-तालुकास्तरिय फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने संबंधीत आमदारांसमोर समस्या मांडल्यास काहीप्रमाणात मदत मिळण्याची शक्मयता आहे. सरकारद्वारे आर्थिक मदत मिळण्याच्या दिशेने प्रयत्न होणेही गरजेचे आहे. याशिवाय कर्जमाफीची मागणी करून सरकार दरबारी प्रयत्न करणेही गरजेचे बनले असल्याचे मोहन कोपर्डे यांनी सांगितले आहे.