बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन
प्रतिनिधी / विटा
छत्रपती शिवाजी महाराज यांनी नव्या युगाची निर्मिती केली. त्यामुळेच खर्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज युगपुरूष होते. युगप्रवर्तक शिवछत्रपतींनी एक आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. त्यांच्या राजवटीत गुप्तहेरांचे जाळे अतिशय भक्कम होते. सुमारे तीन ते चार हजार गुप्तहेरांचे नेतृत्त्व बहिर्जी नाईक यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्यातील योद्ध्यांची स्मारकं झाली पाहिजेत. त्यातून समाजाला आणि नव्या पिढीला नवी उर्जा मिळेल, असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
बाणूरगड (ता. खानापूर) येथे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून कार्यकर्त्यांशी सवांद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सदाभाऊ खोत होते. यावेळी भाजपचे राज्य प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर, उपसरपंच कांताताई गायकवाड उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दीर्घकाळ परकियांची राजवट आणि अनागोंदी कारभार अनुभवणार्या महाराष्ट्राला एका चैतन्यसूत्रात बांधण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रदान केलेल्या स्वराज्याने केले. स्वराज्यामुळेच महाराष्ट्र संस्कृतीला आत्मभान आले. युगप्रवर्तक शिवछत्रपतींनी एक आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. त्यांच्या राजवटीत गुप्तहेरांचे जाळे अतिशय भक्कम होते. सुमारे तीन ते चार हजार गुप्तहेरांचे नेतृत्त्व बहिर्जी नाईक यांनी केले. बहिर्जी नाईक यांनी अनेक मोहीम फत्ते केल्या. स्वराज्याच्या सेनानीचे हे अतिशय सार्थ स्मारक ठरेल.
गुप्तहेरांची एक भाषा बहिर्जी नाईक विकसित केली. कारण गुप्तहेरांचे संभाषण कौशल्य हे वेगळ्या पध्दतीचे होते. त्यावेळी आजच्यासारख्या आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. परंतु गुप्तहेर खात्याची एक वेगळी भाषा बहिर्जी नाईक यांनी स्वतः विकसित केली होती. त्या फक्त त्यांच्या गुप्तहेरांना कळत होत्या. ज्या काळात केवळ संशयावरून हत्या केली जात असे, त्या काळात अतिशय पक्की खबर ते काढून आणत असत. त्यांना कधीही पकडता आले नाही. स्वराज्याच्या सेनानीचे हे अतिशय सार्थ स्मारक ठरेल. सुमारे साडेतीन कोटी रूपये खर्च करून हे स्मारक उभारले जात आहे. महाराजांच्या लढ्यातील योद्ध्यांची स्मारकं झाली पाहिजे. त्यातून समाजाला आणि नव्या पिढीला नवी उर्जा मिळेल.
स्वराज्य उभा करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. सामान्यांच्या हातून असामान्य काम करतो, तो युगपुरूष असतो. सामान्य माणसांची शक्ती त्याचे तेज जो जागरूक करू शकतो, तो युगपुरूष असतो. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना आपण युगपुरूष म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी नव्या युगाची निर्मिती केली. त्यामुळेच खर्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज युगपुरूष होते. समाजातील प्रत्येक घटकाशी सामाजिक बांधिलकी जोपासत त्याला राजव्यवस्थेमध्ये महाराजांनी समान न्याय दिला.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत गुप्तहेर बर्हिजी नाईक यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांचे उचित स्मारक करण्याच्यादृष्टीने मी पुढाकार घेतला. माजी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साडेतीन कोटी रूपये खर्चून हे स्मारक साकारले जाणार आहे. या स्मारकासाठी आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या फंडातून 25 लाख रुपये दिले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील भाजपचे अनेक आमदार या स्मारकासाठी आपल्या फंडातून निधी देणार आहेत.
यावेळी जि. प. चे वित्त व बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, जि.प.सदस्य अरुण बालटे, मोहन रणदिवे, आटपाडी पंचायत समिती सभापती जयवंत सरगर, उपसभापती दादासाहेब मरगळे, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, माजी सभापती डॉ. भुमिका बेरगळ, माजी उपसभापती तानाजीशेठ यमगर, माजी उपसभापती रुपेश पाटील, भाजपाचे आटपाडी तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, भाजपाचे खानापूर तालुकाध्यक्ष सुहास पाटील, विष्णूपंत अर्जून, माऊली हळणवर, मुन्नाभाऊ चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.