वाघ नव्हे, माणसाचा वावर वाढल्यानेच संघर्ष, वन्यजीव अभ्यासक अतुल धामणकर यांचे मत
सुकृत मोकाशी / पुणे :
आज जंगलाचा फक्त 3 टक्के भाग संरक्षित राहिला आहे. उरलेल्या 97 टक्क्यांवर माणसाने आक्रमण केले आहे. त्यामुळे वाघाचा नव्हे, तर मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळेच संघर्ष झडतो आहे. सर्वत्र माणसाने वावर केला, तर कुठल्याच प्राण्याला अस्तित्व राहणार नाही. हे पाहता आपण स्वतःला आवर घातला पाहिजे, असे मत वन्यजीव अभ्यासक, लेखक आणि छायाचित्रकार अतुल धामणकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.
धामणकर म्हणाले, वाघाला एका जंगलातून दुसऱया जंगलात जायला रस्ता लागतो. त्यामुळे दोन जंगलांना जोडण्यासाठी कॉरिडॉर पाहिजे. जंगलाच्या बाजूचे जे पट्टे आहेत त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. ते पट्टे प्रोटेक्ट केले, तर वाघ ये-जा करू शकतात. पूर्वी जंगले होती. पण, आता माणसाने त्या जागांवर आक्रमण केले आहे. वस्ती, शेतीमुळे यात बाधा आली आहे. वाघ जिथून रस्ता मिळेल तिथून जाणार. त्यामुळे माणसाने वाघांच्या वस्तीवर गदा येऊ देता कामा नये.
भारतात तीन हजार, तर ताडोबात 125 वाघ
भारतात सध्या तीन हजारच्या आसपास वाघ आहेत. तर ताडोबाच्या अभायरण्यात बफर आणि कोअर या दोन भागात मिळून 125 वाघ आहेत. ताडोबामध्ये वाईल्डलाईफ टुरिझममधून ताडोबातील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. वाघ आणि तिथले स्थानिक लोक यांचे एकमेकांशी जगणे-मरणे निगडीत झाले आहे. माणसांनी वाघाला समजून घेणे गरजेचे आहे. ताडोबात वाइल्डलाईफ टुरिझम नसते, तर वाघ वाचले नसते. पर्यटकांवर थोडेसे निर्बंध घालून जंगलांची सफर घडवली पाहिजे. जंगलात जयला बंदी केली, तर निसर्गप्रेमी कसे तयार होणार, असा सवालही धामणकर यांनी यावेळी उपस्थित केला.