सहय़ाद्री जीवरक्षक टीमचे कौतुकास्पद कार्य
प्रतिनिधी / वैभववाडी:
करुळ धनगरवाडी व केगदवाडी येथील धनगर कुटुंबांना करुळ सह्याद्री रक्षक टीमने तब्बल पाच कि. मी. जंगलातून पायपीट करत रास्तधान्याची घरपोच सेवा दिली. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱया या सह्याद्री जीवरक्षक टीमचे धनगर बांधवांनी आभार मानले.
घाटमार्गातील अपघात असो वा ओढवलेली नैसर्गिक आपत्ती असो… पोलीस व आपत्ती प्रशासनाला स्वतःचा जीव धोक्मयात घालून सह्याद्री जीवरक्षक टीम आतापर्यंत अनेक ठिकाणी कार्यरत असते. या टीमने अनेक वेळा प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी करुळ सोसायटीच्यावतीने रास्त धान्य देण्यासाठी गावातील प्रत्येक वाडीला वार व वेळ ठरवून दिली आहे. दुकानापासून धनगरवस्तीचे अंतर अंदाजे पाच ते सहा कि.मी. इतके आहे. काही वयोवृद्धांना मिळालेले धान्य ते स्वतः घेऊन जाऊ शकत नव्हते. त्यांना सह्याद्री रक्षकांनी मदतीचा हात दिला आहे. जंगलातील पायवाटेने सह्याद्री रक्षक टीमचे प्रमुख हेमंत पाटील, सदस्य तुकाराम पवार, विजय पवार व अमर शिंदे या रक्षकांनी त्यांचे रेशन धान्य घरी पोहोच केले आहे. या समाजकार्याबद्दल तहसीलदार रामदास झळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी या रक्षकांचे आभार मानले.