नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशातील कोरोना स्थितीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार केंद्र सरकारवर निशाणा साधत असतात. आज देखील त्यांनी ट्वीटरवरून केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावरून टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, कोरोना लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या प्रत्येकाला लस मिळायला हवी. त्यासाठी ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता नसावी. कारण जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही.
देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने केवळ कोविड योद्धे आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. तर राज्यांनी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लसींचा साठा मोफत करणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर भाजपकडून नरेंद्र मोदींचे कौतुक होत आहे. तर विरोधक याचे श्रेय सर्वोच्च न्यायालयाला देत आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील एक प्रश्न उपस्थित केला होता. एक साधा प्रश्न – जर लस सर्वांसाठी विनामूल्य असेल तर खाजगी रुग्णालयांनी पैसे का घ्यावेत” असा सवाल त्यांनी केला होता.राहुल गांधी यांच्याप्रमाणे प्रियांका गांधी देखील मोदी सरकारवर देशातील कोरोना स्थितीवरून निशाणा साधत असतात.