वार्ताहर / रामनगर
दांडेली बस डेपोच्या अधिकाऱयांनी आश्वासनांची पूर्तता न केल्याने मंगळवारी जगलबेट ग्रामस्थांनी दांडेली विभागाच्या बस रोखून धरल्या होत्या. त्यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
रामनगर-जगलबेट भागातून गणेशगुडी व दांडेली येथे 100 हून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. या भागातील विद्यार्थ्यांसाठी एकच बस असून त्यांना शालेय शिक्षणासाठी जाताना बस नसल्यामुळे अनेकदा घरातच बसावे लागते तर काहीवेळा गर्दी पाहून बस थांबवत नाहीत तसेच अनेकदा बसमधील चेंगराचेंगरीत विद्यार्थी जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे या मार्गावर आणखीन एक बस सुरू करण्याची मागणी गावकऱयांनी दांडेली बस विभागाकडे केली होती. तसेच तातडीने बस न पाठविल्यास दांडेली विभागाच्या सर्व बसेस रोखण्यात येतील, असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी दांडेली विभागाच्या पाच बसेस गावकऱयांनी रोखून धरल्या. त्यामुळे अखेर रामनगर उपनिरीक्षिका मंजुळा रावजी यांनी मध्यस्थी करून बुधवारपासून ज्यादा बस सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी अडविलेल्या 5 बसेस सोडण्यात आल्या. तसेच दांडेली बस विभागाच्या अधिकाऱयांनी गावकऱयांना जादा बस सोडण्याचे लेखी आश्वासन देण्याचे सांगितले.
यावेळी जगलबेट ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष गिरीश नाईक, ता. पं. सदस्य बळवंत देसाई, सुहास देसाई, संदीप भट, सुभाष तांबे व इतर नागरिक उपस्थित होते.