ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणानंतर उडालेल्या गोंधळामध्ये संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांची क्राईम ब्रान्चमधून बदली देखील करण्यात आली आहे. आता सचिन वाझेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसने खळबळ उडाली आहे. ‘जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत’, अशा आशयाचे व्हॉट्सॲप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं आहे.
पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी ठेवलेल्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये म्हटले आहे की, 2004 मध्ये त्यांना सीआयडीनं अशाच चुकीच्या पद्धतीनं अटक केलं होतं. माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांनी मला फसवलं होतं. मात्र त्यावेळी मााझ्याकडे 17 वर्षांच्या अपेक्षा आणि नोकरी बाकी होती आणि पेशन्स देखील होते. मात्र आता माझ्याकडे ना 17 वर्षांचे आयुष्य आहे ना सहनशक्ती आहे ना नोकरी आहे. त्यामुळे जगाला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे, असे सचिन वाझेंनी म्हटले आहे.
17 वर्षांपूर्वीही मला फसवण्याचा प्रयत्न केला होता, तो आता दुसऱ्यांदा होते आहे. ही स्टोरी चुकीची आहे. या सर्व गोष्टी राजकीय दबावापोटी आणि मीडिया ट्रायलमुळे होत आहेत. 4 आणि 5 मार्च रोजी मी साऊथ मुंबईमध्ये होतो आणि मनसुख हिरण ठाण्यात होता आणि त्याची बॉडी मुंब्य्रात मिळाली, असेही वाझेंनी म्हटले आहे.
दरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सचिन वाझे यांचे स्टेटस वाचल्यानंतर मुंबई पोलिसांच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांना स्टेटस डिलिट करण्यास सांगितलं आहे. त्यांनी काही चुकीचं पाऊल उचलू नये यासाठी त्यांच्याशी वरिष्ठांनी संपर्क केला आहे.