आज आपण सर्वत्र पाहत आहोत की समाज अनेक भेदभावानी त्रस्त झालेला आहे. समाजातील वैरभावना, एकमेकांशी द्वेष वाढत चाललेला आहे. जगामध्ये अनेक कारणांनी युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अगदी ज्यामुळे सर्वानी एकत्र आले पाहिजे अशा पवित्र धर्माच्या नावाने सुद्धा युद्धे होत आहेत. वर्णभेद, वंशभेद, लिंगभेद, राजकीय पक्षभेद, प्रांतभेद, भाषाभेद, वेषभेद, संस्कृतीभेद, मी श्रे÷ का तू श्रे÷ अशी सर्वच क्षेत्रात स्पर्धा चालू आहे. अशावेळी सर्वात पुढे जाण्यासाठी एकमेकांचे पाय ओढणे, फसवणूक करणे हे सर्वमान्य होत चालले आहे. सध्या समाज जगाच्या इतिहासात कधी नव्हे इतका गोंधळलेल्या अवस्थेत आहे. अशा भ्रमित अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी वेदिक ग्रंथ प्रामुख्याने भगवद्गीता आणि त्यातील ज्ञानावर आधारित संत तुकारामांचे अभंग मार्गदर्शन करू शकतात.
संत तुकाराम एका अभंगात समाजातील भेद कसे संपुष्टात येतील हे सांगताना आपल्याला एक दृष्टी देत आहेत. त्या दृष्टीतून पाहिल्यास आपले सर्व भेद निश्चितच संपुष्टात येतील. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।।1।। आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ।।2।। कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।3।। तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ।। 4।। अर्थात सर्व जग, त्यातील जीवित आणि जड वस्तू हे विष्णुमय आहेत, असे जाणणे हाच वैष्णवांचा धर्म आहे. भेदाभेद, मतभेद, वादविवाद हा केवळ अमंगळ (अशुभ) भ्रमच आहे. अहो भागवतभक्त (हरी भक्त) तुम्ही माझे ऐका. वैष्णवांचे खरे लक्षण समजून घेऊन स्वतःचे हित करून घ्या. आपल्याकडून कोणत्याही जीवांचा द्वेष, मत्सर घडू देऊ नये, कारण सर्व ठिकाणी भगवंताचे अस्तित्व व्यापून आहे, हे जाणणेदेखील त्या सर्वेश्वर विष्णूच्या पूजेचे रहस्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात ‘ज्याप्रमाणे शरीराच्या कोणत्याही
अवयवाला दुखापत झाली तरी आपल्याला वेदना होतात, त्याप्रमाणे कोणत्याही जीवाचा मत्सर केल्यास प्रत्यक्ष भगवंताचा मत्सर केल्यासारखे आहे, कारण सर्व जीव त्यांचे अंश आहेत.’ वैष्णवांच्या म्हणजे भगवान विष्णूभक्तांच्या समदृष्टीचे वर्णन या अभंगात केले आहे.
सर्वप्रथम हे जाणले पाहिजे की भेद हे शारीरिक स्तरावर असतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 15.7) ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः । मनःष÷ानीन्दियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। अर्थात ‘सर्व बद्ध जगतातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत’ आपण शरीर नसून सच्चिदानंद आत्मा आहोत आणि भगवान श्रीकृष्णाचे अंश आहोत. हे साधे सरळ ज्ञान आपल्याला सर्व समस्यातून कायमचे मुक्त करते. आपले मूळ अस्तित्व ‘आत्मा’ आहे हे जेव्हा आपण विसरतो तेव्हा शरीरावर आधारित भेद निर्माण होतात आणि हेच भेद जगातील सर्व समस्यांचे मूळ आहे. ह्या शारीरिक भेदाभेदातून मुक्त झाल्याशिवाय आपल्याला वैयक्तिक जीवनापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत शांती, समाधान, एकोपा प्राप्त होणे शक्मय नाही. आपण आत्मा असून भगवंताचे अंश आहोत, हे जी व्यक्ती जाणते ती शारीरिक स्तरावर कोणताही भेदभाव करीत नाही. शारीरिक भावनेतूनच द्वेष, मत्सर, राग इत्यादी उत्पन्न होतो. परंतु वैष्णव सर्व जीवांकडे समदृष्टीने पाहतो. तो कोणताही शारीरिक भेद करीत नाही. अशा व्यक्तीला शास्त्रामध्ये पंडित, ज्ञानी, महात्मा, ब्राह्मण, वैष्णव, साधू म्हणून संबोधले जाते. अशा समदृष्टीने पाहणाऱया व्यक्तीविषयी सांगताना भगवद्गीतेमध्ये (भ गी 5.18) विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि । श?नि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ।।अर्थात ‘विनम्र साधुव्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे, विद्याविनयसंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वाना समदृष्टीने पाहते’.
सामाजिकदृष्टय़ा ब्राह्मण, चांडाळ, गाय, हत्ती इत्यादी भिन्न असतील, पण ज्ञानी व्यक्तीच्या दृष्टीने वरवरचे दिसणारे शारीरिक भेद निरर्थक आहेत कारण मूळ स्वभावानुसार हे सर्व जीव भगवंताचे अंश आहेत. ज्याप्रमाणे भगवंत सर्व प्राणिमात्रांशी प्रेमाने वागतात, त्याचप्रमाणे वैष्णवदेखील सर्व जीवांचा द्वेष न करता त्यांच्याशी प्रेमाने वागतात. आपल्या शरीराचे हात, पाय, डोळे, नाक, कान इत्यादी निरनिराळे भाग आहेत. कोणत्याही एका अवयवाला दुखापत झाली तर त्या व्यक्तीला वेदना होतात. त्याचप्रमाणे कोणत्याही जीवाचा द्वेष केल्यास तो प्रत्यक्ष भगवंताचा द्वेष करणे होय. अशा रीतीने आपण समजू शकतो की भगवंत हे सर्व जीवांचे पिता आहेत. या ज्ञानावर आधारित आपण इतरांशी व्यवहार केल्यास समाजामध्ये संघर्ष होणार नाही. भागवतमध्येही अशा वैष्णव महात्म्याचे वर्णन आहे. (भा 5.5.2) महान्तस्ते समचित्ताः प्रशान्ता विमन्यवः सुहृदः साधवो ये ।। अर्थात ‘महात्मे समचित्त असतात, ते दोन जीवांमध्ये भेदभाव करीत नाहीत. ते पूर्णपणे शांत आणि भक्तिमय सेवेमध्ये रमलेले असतात आणि इतरांच्या कल्याणार्थ कार्य करीत असतात. ते कोणत्याही प्रकारचे घृणास्पद कार्य करीत नाहीत. त्यांच्या ठायी असणाऱया या सर्व गुणांमुळेच ते ‘महात्मा’ म्हणून ओळखले जातात. या जगात मनुष्याने कुत्रा मांजराप्रमाणे भांडणे योग्य नाही. सामान्य पशुप्रमाणे भांडण्याचे नाकारण्याइतपत मनुष्याने बुद्धिमान असणे आवश्यक आहे. समाजामध्ये व्यक्ती या दृष्टीने समाधानी नसण्याचे कारण शारीरिक स्तरावरील अमर्याद स्वार्थ होय. आणि तोच स्वार्थ पुढे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विस्तारित झालेला आहे. आपण ज्या जगात जन्माला आलेलो आहोत या जगातील सर्व वस्तू अगदी स्वतःचे शरीरसुद्धा आपण निर्माण केले नाही पण त्यावर अधिकार मात्र सर्वच जण सांगतात. ह्यातूनच वैयक्तिक ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मालकी हक्क गाजविण्याची स्पर्धा चालू होते. यासाठी सर्वानीच ओळखले पाहिजे की सर्व सृष्टीचे मालक भगवंत आहेत. उदाहरणार्थ पृथ्वी, पाणी, हवा, सूर्य, चंद्र इत्यादी सर्व काही आपण बनविलेले नाही. या जगामध्ये नदी समुद्र यातील पाण्यासाठी, पृथ्वीवरील जमिनीसाठी वैयक्तिक स्तरापासून ते देशादेशामध्ये संघर्ष चालले आहेत. अंतराळात चंद्रावर जाण्यासाठी देशा देशामध्ये स्पर्धा चालल्या आहेत. या सर्व गोष्टी अगोदरही इथे होत्या आणि आपण गेल्यावरही इथेच राहणार आहेत, मग अल्पशा आयुष्यात त्यासाठी भांडायचे कशाला? याउलट या सर्व सृष्टीचे संचालन कोण करीत आहे याचे ज्ञान प्राप्त केले तर संघर्षाचा प्रश्नच उद्भवणार नाही.
-वृंदावनदास