वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार भारतात 2025 साली एक हजारपैकी अधिक मोठी धरणे सुमारे 50 वर्षे जुनी होणार आहेत. जगभरात अशाप्रकारची जुनी बांधकामे भविष्यात धोक्याचे कारण ठरू शकतात. 2050 पर्यंत जगातील बहुतांश लोकसंख्या 20 व्या शतकात निर्माण करण्यात आलेल्या या हजारो धरणांच्या खालील क्षेत्रात वसलेली असणार आहे आणि याचमुळे जुन्या धरणांद्वारे त्यांना गंभीर धोका होऊ शकतो.
‘एजिंग वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर ः इन इमर्जिंग ग्लोबल रिस्क’ असे शीर्षक असलेला हा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या कॅनडा येथील जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थेने तयार केला आहे. जगातील एकूण 58,700 मोठय़ा धरणांपैकी बहुतांश धरणांचे निर्मिती कार्य 1930 ते 1970 दरम्यान झाले आहे. त्यांना 50 ते 100 वर्षांसाठी निर्मिण्यात आले होते, असे अहवालात म्हटले गेले आहे.
50 वर्षांपेक्षा अधिक वयोमान
काँक्रिटद्वारे तयार धरण 50 वर्षांनी जुने होते. याचमुळे जगातील हजारो धरणे सध्या धोकादायक स्थितीत पोहोचली आहेत. त्यांची भिंत तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. बहुतांश जुन्या धरणांचा देखभाल खर्च वाढतो आणि त्यांची जलसाठवणूक क्षमताही कमी होत असल्याचे अहवालात नमूद आहे.
मोठय़ा लोकसंख्येसमोर संकट
संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेच्या विश्लेषणानुसार 2050 पर्यंत जगातील बहुतांश लोकसंख्या याच हजारो धरणांच्या खालील क्षेत्रात वसलेली असणार आहे. अहवालात ही बाब भारत, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जपान, जांबिया, झिम्बाम्बेमध्ये तयार करण्यात आलेल्या धरणांचे अध्ययन करण्यात आल्यावर नमूद करण्यात आली आहे. यानुसार एकूण धरणांचे 55 टक्के म्हणजेच 32,716 मोठी धरणे चार आशियाई देश चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये आहेत. यातील बहुतांश धरणे लवकरच 50 वर्षांपेक्षा अधिक जुनी होणार आहेत.
भारतातील 1115 धरणे धोक्याच्या शेणीत
अहवालानुसार भारतातच 1115 मोठी धरणे 2025 मध्ये 50 वर्षे किंवा त्याहून अधिक जुनी होणार आहेत. देशातील 4250 पेक्षा अधिक मोठी धरणे 2050 मध्ये 50 वर्षांची होतील. तर 64 मोठी धरणे 2050 मध्ये 150 वर्षांपेक्षा अधिक जुनी होणार आहेत. भारतात केरळमधील मुल्लापेरियार धरण 100 वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. यात काही गडबड झाल्यास सुमारे 35 लाख लोक धोक्यात येणार आहेत.