इबोलाचा शोध लावणाऱया तज्ञाने दिला इशारा : सदाहरित जंगलांमध्ये अनेक घातक विषाणू
जगात कोविड-19 प्रमाणेच आणखी एक महामारी अत्यंत वेगाने फैलावत असल्याचा इशारा इबोलाचा शोध लावणाऱया तज्ञाने दिला आहे. या महामारीला डिसिज एक्स म्हटले जात असून तो इबोलाप्रमाणेच अत्यंत घातक आहे. 1976 मध्ये इबोला विषाणूचे संशोधन करताना सहाय्य करणारे प्राध्यापक जीन-जॅक्स मुयेम्बे तामफूम यांनी अज्ञात संख्येत नव्या विषाणूंचा माणूस सामना करत असल्याचे म्हटले आहे. आफ्रिकेच्या सदाहरित जंगलांमधून नवे आणि घातक विषाणू बाहेर पडण्याचा धोका असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
कांगोच्या महिलेला गूढ आजार
नवे विषाणू बाहेर पडू शकणाऱया जगात आम्ही आहोत. हे विषाणू मानवतेसाठी धोका ठरतील. भविष्यात येणाऱया महामारी कोरोना विषाणूपेक्षा अधिक धोकादायक असतील आणि त्या मोठे नुकसान घडवून आणणाऱया ठरतील. असे तामफूम यांनी म्हटले आहे. यापूर्वी कांगोच्या इगेंडेमध्ये एका महिलेत गूढ आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. हा ‘डिसिज एक्स’चा पहिला रुग्ण असल्याची डॉक्टरांनी भीती आहे. नवा विषाणू कोरोनाप्रमाणेच वेगाने फैलावू शकतो, परंतु यामुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या इबोलापेक्षा 50-90 टक्क्यांनी अधिक आहे.
अधिक घातक डिसिज एक्स महामारी
डिसिज एक्स महामारी सद्यकाळात वास्तव नसले तरीही याचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव झाल्यास पूर्ण जगात मोठे नुकसान घडून येण्याची शक्यता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. प्राध्यापक जीन यांनीच पहिल्यांदाच गूढ विषाणूने पीडित रुग्णाचा रक्तनमुना प्राप्त केला होता, ज्याला नंतर इबोला नाव देण्यात आले होते. इबोला विषाणूची पुष्टी होईपर्यंत यामबुकू मिशन हॉस्पिटलमध्ये 88 टक्के रुग्ण आणि 80 टक्के कर्मचाऱयांचा मृत्यू झाला होता. इबोला झाल्यावर रक्त वाहू लागते आणि रुग्णाचा मृत्यू होतो. प्राध्यापक जीन यांनी प्राप्त केलेला रक्तनमुना बेल्जियम आणि अमेरिकेत पाठविण्यात आला होता. तेथे रक्तात वार्मच्या आकाराचा विषाणू असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले होते.
वन्यप्राण्यांमधून माणसांमध्ये पोहोचले अनेक विषाणू
आतापर्यंत कावीळ, अनेक प्रकारचे इन्फ्लुएंजा, रॅबीज आणि अन्य आजार प्राण्यांमधूनच माणसांमध्ये पोहोचले आहेत. यातील बहुतांश आजार उंदिर किंवा किटकांच्या माध्यमातून माणसांमध्ये पोहोचले आहेत. यातूनच प्लेगसारखी महामारी जगाने अनुभवली आहे. प्राण्यांचे अधिवास संपुष्टात येत असून वन्यजीवांची तस्करी वाढली आहे, यातूनच विषाणू फैलावाची प्रकरणे वाढत आहेत. नैसर्गिक अधिवास संपुष्टात आल्यास मोठे वन्यजीव संपतील आणि उंदिर, वटवाघुळ, किटक वाचतील. सार्स, मर्स आणि कोरोना विषाणूही प्राण्यांमधूनच माणसांमध्ये शिरले आहेत.
3-4 वर्षांनी नवा विषाणू
ब्रिटनच्या एडिनबर्ग विद्यापीठाच्या संशोधनानुसार दर तीन ते चार वर्षांनी एक नवा विषाणू जगासमोर येत आहे. वन्यप्राण्यांची कत्तल होत राहिल्यास इबोला आणि कोरोना विषाणूसारखी महामारी येतच राहणार आहे. वुहानसारख्या मांसबाजारात ठेवण्यात आलेल्या जिवंत प्राण्यांमुळे मोठा धोका आहे. या प्राण्यांमध्येच डिसिज एक्स महामारी असू शकते. जिवंत प्राण्यांचे बाजार माणसांमध्ये फैलावणाऱया आजारांसाठी जबाबदार असल्याचे विद्यापीठातील प्राध्यापक मार्क वूलहाउस यांनी म्हटले आहे. कोरोना हा विषाणू वटवाघळांमधून फैलावल्याचे मानले जाते.