उमदी / प्रतिनिधी
जत तालुक्यातील उटगी येथे विजेचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की उटगी ते हळळी रस्त्याजवळ असणाऱ्या ढगारे वस्ती येथे मयत शेतकरी तेजाप्पा चंद्राम ढगारे (वय 45 आपल्या कुटुंबीयासह राहतात ते शेजारी असणाऱ्या बसवराज सदाशिव निवर्गी यांची शेती वाटणीने करत होते. सदर शेतातील विहिरीजवळ असलेल्या विजेच्या पेटी जवळ मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विद्युत पेटीला हात लावताच विजेचा स्पर्श होऊन तेजाप्पा जागीच ठार झाले.
मोटार चालू करण्यासाठी गेलेला मुलगा परत आलाच नसल्याने वडील चंद्राम ढगारे हे विहिरीकडे गेले असता मुलगा मयत झाल्याचे पाहिले. याबाबत वडील चंद्राम ढगारे यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महावितरणचे सहाय्यक अभियंता गुरव यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. तसेच उमदी पोलिसांनी देखील घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. रात्री उशिरा मयत शेतकरी तेजाप्पा ढगारे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश ह्रदय पिटाळून टाकणारा होता.