ऑनलाईन टीम / मुंबई :
पालघर हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा या मागणीसाठी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुंबई ते पालघर जनआक्रोश यात्रेचे आयोजन केले होते. परंतु, याआधीच भाजप नेते राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता राम कदम खार पोलीस ठाण्यातून बाहेर आले आहेत.
राम कदम यांच्या निवासस्थानापासून यात्रेला सुरुवात होणार होती. यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी आपल्या घराबाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच राम कदम ज्या गाडीतून प्रवास करत ही यात्रा काढणार होते. ती गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गाडीवर लावण्यात आलेले काळे झेंडेही पोलिसांनी काढून टाकले आहेत. तसेच त्या परिसरातील कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी हटवले. राम कदम यांची समजूत काढण्याचाही पोलिसांनी प्रयत्न केला.
पोलिसांची ही कारवाई दुर्दैवी असून सरकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याची प्रतिक्रिया राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
भाजप नेते राम कदम यांनी पालघर हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा या मागणीसाठी आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या ठिकाणापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र या यात्रेला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली नव्हती त्यामुळे यात्रा सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी कदम यांना ताब्यात घेतले.
आता राम कदम यांची सुटका करण्यात आली असून ते खार पोलीस स्थानकातून बाहेर आले आहेत. मात्र, राम कदम यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा घेतला आहे.