गोळवलकर प्रकल्पात मंगळवारी दुपारी अडीच वाजता घेतले ताब्यात
वार्ताहर/ संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण
सोमवारी महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जनआशीर्वाद यात्रेसाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वर तालुक्यातील प. पु. गोळवलकर गुरुजी प्रकल्पात कार्यक्रमानंतर पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी ताब्यात घेतले. मंगळवारी दुपारी 2.30 वा. झालेल्या कारवाईनंतर सायंकाळी 5 च्या दरम्यान त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. राणे यांना गोळवलीत अटक केल्यानंतर त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सध्या ‘बेक’ लागला आहे. आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद मंगळवारी जिल्हय़ात उमटले. चिपळुणात सेना-भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. चिपळुणात 2 ठिकाणी शिवसेनेकडून राणेंना रोखण्याचा प्रयत्न झाला. दगडफेकीचे प्रकार अन् बॅनरही फाडण्यात आले. झटापटी होत असतानाच पोलिसांनी कडे करत कार्यकर्त्याना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. या गोंधळामुळे तब्बल 4 तास चिपळूण तणावाखाली राहतानाच मुंबई-गोवा महामार्गही काही काळ बंद ठेवावा लागला.
दरम्यान, राणे यांच्या अटकेनंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात मोठे पडसाद उमटले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घटकेची ही कृती घटनाबाहय़ असल्याचे म्हटले आहे. तर शिवसेनेने नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार राडा केला. पुणे, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नागपूर येथे शिवसैनिकांनी आंदोलन, प्रतिमा दहन आंदोलन केले. जुहू येथील राणेंच्या बंगल्यासमोरच हा राडा झाला. यावेळी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या अटकेची भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही दखल घेतली. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्र सरकारची ही कृती घटनाबाहय़ असल्याचे म्हटले आहे तर पक्षप्रवक्ते संबित पात्रा यांनी महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा खून झाल्याचे म्हटले आहे.
केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मंगळवारी या यात्रेला सुरुवात होण्यापूर्वीच चिपळूणमध्ये राणे यांना अटक होणार की काय, अशी चर्चा सकाळपासून सुरु होती. मात्र चिपळूणमधील पत्रकार परिषदेत राणे यांनी तीव्र टिकास्त्र सोडून यात्रेला सुरुवात केली होती. चिपळूण, सावर्डा, आरवली येथे त्यांने जंगी स्वागत झाले. यानंतर ही यात्रा संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील प. पु. गोळवलकर गुरुजी प्रकल्पात आली. येथे प्रकल्पाच्या कार्यालयात संघाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांसमवेत प्रकल्पासंबंधी आढावा घेण्यात आला. हा आढावा घेवून झाल्यानंतर प्रकल्प सभागृहामध्ये जाहीर कार्यक्रम पार पडला. ही आढावा बैठक सुमारे अर्धा तास व कार्यक्रमस्थळी 20 मिनिटे एवढा वेळ झाल्यानंतर नारायण राणे कार्यालयात थांबले होते.
पुढील कार्यक्रमाला जाण्यापूर्वी राणे प्रकल्प कार्यालयात असतानाच रत्नागिरी पोलिसांच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या. या हालचाली राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेवून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागून घेतला. एकीकडे पोलिसांच्या हालचाली तर दुसरीकडे राणे समर्थकांची संख्या वाढत होती. त्यामुळे प्रकल्प परिसरात वातावरण तणावपूर्ण झाले होते. राणे प्रकल्पस्थळी दुपारी 1.10 वाजता दाखल झाले. तेथील चर्चेनंतर दुपारी 1.45 वाजता जाहीर सभेला दाखल झाले.
त्यानंतर 3.20च्या दरम्यान पोलिसांनी जादा कुमक बोलावून राणे यांना ताब्यात घेतले. राणे यांना ताब्यात घेतेवेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वातावरण तासभर तणावपूर्ण झाले होते. यावेळी आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष ऍड, दीपक पटवर्धन, नितेश राणे आदी उपस्थित होते. अटकेचे संकेत मिळताच राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वकिलांना पाचारण करुन जामीन मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला, मात्र यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. यावेळी मीडियासोबत काहीशी बाचाबाचीही झाली. यानंतर प्रमोद जठार यांनी मीडियाची जाहीर माफी मागितली.
ताब्यात घेण्यापूर्वी राणेंची आरोग्य तपासणी
राणे यांना ताब्यात घेण्यापूर्वी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अंबरीश आगाशे यांनी त्यांची तपासणी केली. त्यांनतर दुपारी 3.20 ला राणे यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्यापाठोपाठ कार्यकर्त्यांच्या गाडय़ांचा मोठा फौजफाटाही होता. यावेळी कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग सुमारे दिड तास रोखला होता. सायंकाळी 5 च्या दरम्याने राणे यांना महाड पोलिसांनी ताब्यात घेवून महाडकडे प्रयाण केले.
जेवण चालू असताना घेतले ताब्यात
मंत्री राणे यांचे जेवण चालू असताना त्यांना अमानुषपणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केला. आपल्याकडे तसा व्हिडिओ असून तो व्टिट केल्याचे सांगितले. पोलीस अधीक्षकांना कोणत्या कलमाखाली आणले आहे, याची विचारणा केली असता त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही. राणेंना पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत बसवून ठेवण्याचा आणि त्यांना त्रास देण्याचा विचार दिसत असल्याचे सांगितले. त्यांना जीविताला धोका असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राणेंनी असा कोणता गुन्हा केलाय?
प्रमोद जठार म्हणाले राणेसाहेबांची सुटका होत नाही, तोपर्यंत भाजप कार्यकर्ते शांत राहणार नाहीत. यापुढे जनआशीर्वाद यात्रा पूर्ण करणार, असेही पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना त्यांनी सांगितले. यापूर्वी जठार यांनी प्रकल्पस्थळी बोलताना या सरकारकडून गुंडागर्दीला प्राधान्य दिले जात आहे. मोठमोठे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. मात्र राणेंनी असा कोणता गुन्हा केला आहे, असा सवालही उपस्थित केला होता.
जनआशीर्वाद यात्रा पूर्ण होणार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे जन आशीर्वाद यात्रेचे रत्नागिरीतील आयोजित कार्यक्रम रद्द करावे लागले. पण ही जनआशीर्वाद यात्रा पूर्ण होणार असल्याचे भाजपाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. या दिवशी निवळीपासून पुढे रत्नागिरीत आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण या घटनेने कार्यकर्ते डगमगले कसून यापुढे अधिक जोमाने कामाला लागणार आहेत. निर्धार पक्का असल्याचे भाजपावतीने सांगण्यात आले.