दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निवेदन
सागर जावडेकर/ पणजी
“आपल्याला स्वत:ला कोणतीही अपेक्षा नाही, स्वार्थही नाही. परंतु जनतेचे कल्याण होत असेल तर आपण कोणाचेही पाय पकडण्यास तयार आहे. केंद्र सरकारने दिल्लीला कोरोनामुक्त होण्यासाठी आम्हाला खूप मदत केली, सहकार्य केले. त्यामुळे निश्चितच आपण त्यांचा आभारी आहे. कोरोनाच्या बाबतीत केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे ‘आप’ने समर्थन केले. याचा अर्थ राजकारणात आम्ही कोणाकडेही तडजोड करू, असा काढला जाऊ नये. काँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.’’ असेही ते म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना अत्यंत मोकळेपणाने आपले सारे विचार व्यक्त केले.
आपल्या देशाची लोकसंख्या लक्षात घ्यावी
कोरोनाचा वाढता फैलाव हा चिंताजनक विषय निश्चित आहे. परंतु जागतिक पातळीवर कोरोनाच्या बाबतीत आपला देश द्वितीय स्थानावर पोहचला म्हणून रडून चालणार नाही. आम्ही लढायला सज्ज झालेच पाहिजे. आपल्या देशाची लोकसंख्या लक्षात घ्या. साहजिकच रुग्णांची संख्या वाढणारच. मात्र आम्ही सर्वांनी मिळून कोरोनाशी मुकाबला केला पाहिजे.
आमच्यावर टीका करणाऱयांकडून कौतुकाचा वर्षाव
कोरोनाचे रुग्ण नवी दिल्लीत सुरुवातीच्या काळात वाढू लागताच दिल्लीतील सारी प्रसारमाध्यमे दिल्ली सरकारवर तुटून पडली. मात्र आम्ही त्यावर कोणतीही टीका न करता कामे सुरू केली. केंद्र सरकारने आम्हाला भरपूर मदत दिली. सहकार्य केले. आम्ही कोरोना विरोधातील मोहीम घरोघरी पोहोचविली. ज्या दिल्लीतील इस्पितळांवर माध्यमातून टीका व्हायची, आज ती माध्यमे आमच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहे.
राजकारणात स्वार्थासाठी उतरलेलो नाही
आपण दिल्लीचा मुख्यमंत्री झाल्यास 7 वर्षे झाली. त्यातून आपण बरेच काही शिकलो. आपल्यावर काही राजकीय नेत्यांनी कोणत्याही पातळीवर जाऊन टीका केली. परंतु आपण कधीही विरोधकांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली नाही. आमचा ‘आप’ पक्ष हा जनतेचा आहे. जनतेच्या कल्याणासाठी आपण वाट्टेल ते करायला तयार आहे. वेळप्रसंगी कोणाचे पाय देखील पकडायला तयार आहोत. कारण राजकारणात स्वार्थासाठी उतरलेलो नाही, असे केजरीवाल म्हणाले.
केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे केले पालन
केंद्र सरकारवर आपण टीका न करता त्यांनी जे जे काही उपाय सांगितले ते आम्ही निमुटपणे स्वीकारले. पाळले. त्याची अंमलबजावणी केली. लॉकडाऊनच्या काळात आपण जनतेपर्यंत जाऊन पोहोचलो व कामे केली. कोरोनाची भीती मला वाटत नाही. जनतेनेही वाटून घेऊ नये. परंतु घरच्या घरी विलगीकरण करून घेऊन काळजी घेतल्यास कोरोनाग्रस्त माणूस बरा होतो.
गृह विलगीकरणातील एकही रुग्ण नाही दगावला
नवी दिल्लीत असंख्य पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. आम्ही त्यांना घरच्या घरी राहून विलगीकरणाचा सल्ला दिला. आपचे कार्यकर्ते ऑक्सिमीटर घेऊन घरोघरी पोहोचले. ज्यांनी घरीच राहून विलगीकरण करून घेतले त्यातील एकही रुग्ण दिल्लीत दगावला नाही. आम्ही जास्तीत जास्तपणे अत्यंत प्रामाणिकपणे कोरोनाच्या काळात जनतेला मदत केली.
गेली 70 वर्षे जनतेची फसवणूक
आज आम्ही कोरोनाशी दोन हात करून उभे आहोत. खरे तर अशी पाळी आमच्यावर येताच कामा नये होती. मात्र गेली 60 ते 70 वर्षे काँग्रेस आणि भाजपने देशावर राज्य चालविले. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जनतेची फसवणूक केली. जनतेला आरोग्य सुविधा देखील व्यवस्थित दिलेल्या नाहीत. पाहिजे त्या प्रमाणात इस्पितळे निर्माण केली नाहीत. परिणामी आज रुग्णांना ठेवणार तर इस्पितळे कमी पडत आहेत. विविध पातळीवर आरोग्य क्षेत्रात जेवढे संशोधन आवश्यक होते तेवढे झाले नाही, केले नाही. परिणामी देशातील जनता आजारी पडल्यानंतर त्यातून वाचणाऱयांचे प्रमाण त्या तुलनेत कमी आहे. देशात आरोग्य सुविधेविना आजही हजारो माणसे आपले प्राण गमावतात, असे केजरीवाल म्हणाले.
आमदार खरेदी हा काँग्रेस व भाजपचा व्यवसाय
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा गोव्यावर डोळा आहे. गोव्याचे राजकारण आम्हाला साफ करायचे आहे. गोव्यात मागीलवेळी आमच्या पक्षाने निवडणूक लढविली होती. गोव्याचे राजकारण पूर्णत: बदललेले आहे. पहिल्या पाच वर्षासाठी काँग्रेस, पुढील पाच वर्षे भाजप, असे हे दोन राष्ट्रीय पक्ष एकमेकांबरोबर सौदे करून आहेत. वास्तविक काँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे केजरीवाल म्हणाले. काँग्रेस पक्ष आमदार विकतो आणि भाजप आमदार विकत घेतो. काँग्रेसचे 10 व मगोतून दोन आमदार भाजपने घेतले. त्यात फार मोठा अर्थ दडलेला आहे. ते काही उगाच त्या पक्षात गेलेले नाहीत. आमदारांची खरेदी विक्री हा काँग्रेस व भाजपचा मुख्य व्यवसाय बनलेला आहे, अशी केजरीवाल यांनी तोफ डागली.
होय ! ‘आप’ गोव्यातील जनतेसाठी पर्याय बनणार
मागील विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने गोवा व पंजाबमध्ये निवडणूक लढविली होती. यावेळी देखील आम्ही निवडणूक लढविणार. गोव्यातील जनता काँग्रेस व भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांच्या फसव्या जाळय़ात अडकलेली होती. आता गोमंतकीय जनता या दोन्ही पक्षांना कंटाळून ‘आप’ या स्वच्छ नेत्याच्या पक्षाला सक्षम पर्याय म्हणून स्वीकारील. गोव्याची जनता हुशार आहे. या दोन्ही पक्षांना आळीपाळीने मते देऊन जनतेने त्यांचा भ्रष्ट कारभार पाहिलेला आहे. जनता फार कंटाळलेली आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपचे 13 आमदार निवडून आले व काँग्रेसचे 17 म्हणजेच काँग्रेसला केवळ 4 आमदार कमी पडले होते. सरकार हे काँग्रेसचे आले पाहिजे होते. परंतु काँग्रेसने आपले आमदार भाजपला विकले. सरकार भाजपचे सत्तेवर आले. सरकार कोणाचे? सत्तेवर कोण आले? परंतु गोव्याच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. गोमंतकीय जनता लोकशाहीचा मुडदा पाडणाऱयांना पुन्हा सत्तेवर आणतील काय? असा सवाल केजरीवाल यांनी केला.
आपण खूप सवलती दिल्या, तरीही सरकार नफ्यात, कारण भ्रष्टाचार निर्मुलन.
आपण दिल्लीत सवलतीचे राज्य बनवताय, अर्थव्यवस्था कशी सांभाळली? या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, आपण सवलतीचे राज्य बनविले नाही. परंतु जनतेला त्यांच्या मुलभूत गरजा उपलब्ध करून देणे हे आपण आद्य कर्तव्य मानतो. दिल्लीत पाणी मोफत, वीजबिले ठराविक युनिटपर्यंत मोफत, महिलांना बस प्रवास मोफत, शिक्षण मोफत, याशिवाय अनेक सुविधा दिलेल्या असल्या तरी देखील आमचे सरकार आजही नफ्यातच आहे. या मागील मुख्य कारण म्हणजे आपण सत्ता हातात घेतल्यापासून पूर्णत: भ्रष्टाचार उखडून काढला. त्यामुळे सरकारचे पैसे वाचले. जे आम्ही दिल्लीत करून दाखविले ते गोव्यात शक्य नाही का ? आम्ही गोव्यात करून दाखवू. केजरीवाल यांना आत्मविश्वास आहे व त्यांनी तो व्यक्त केला.
अंमलीपदार्थ, खाणी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, राजकीय माकडउडय़ा हे विषय घेणार
गोव्यात विधानसभा निवडणूक येण्यास अद्याप 15 महिने शिल्लक असताना ‘आप’ गोव्यात आपले जाळे विणू पाहत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल म्हणाले की, गोव्यात असंख्य विषय आहेत. विद्यमान राजकीय नेत्यांना येथील जनता कंटाळलेली आहे. अंमलीपदार्थाच्या व्यवहारासाठी गोवा प्रसिद्ध होतोय. हे आम्हा सर्वांचे दुर्देव. अंमलीपदार्थ गैरव्यवहार प्रकरणात अनेक राजकीय नेतेही गुंतलेले आहेत. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. राज्यातील खाण व्यवसाय बंद पडलेला आहे. तो लवकर सुरु झाला पाहिजे. पर्यावरणाचे जतन करून खाणी सुरू झाल्या पाहिजेत. गोव्यात बेरोजगारी वाढतेय. त्यावर उपाय काढला पाहिजे. अगोदर काँग्रेसने व आता भाजपवाले मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. हे सरकार सत्तेवर असेपर्यंत भ्रष्टाचार थांबणार नाही, हे सर्व विषय गोव्यात आम्ही घेणारच आहोत, असे केजरीवाल म्हणाले.
आपल्या 45 मिनिटांच्या ऑनलाईन मुलाखतीद्वारे दैनिक तरुण भारतशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी आम्हाला गोव्यात मोठा राजकीय बदल घडवायचा आहे. जनतेची आम्ही भ्रष्टाचारातून मुक्तता करणार आहोत. जनतेसाठी आम्ही एक सक्षम पर्याय म्हणून उमेदवार आहोत, असे केजरीवाल म्हणाले. या दोन्ही पक्षांनी जनतेला धोका दिला. आम्ही गोव्यात जनतेचे सरकार स्थापन करणार आहोत. त्यामुळेच जनतेने देखील आता गंभीरपणे विचार करायला हवा.
ऑक्सिमीटर मोहिमेला उत्तम प्रतिसाद
आम्ही नवी दिल्लीत ऑक्सिमीटर घराघरात पोहचविला. आता गोव्यातही तो पोहोचविण्याचे काम आपचे कार्यकर्ते करीत आहेत. यातून जनतेला कोरोनापासून सुरक्षा मिळेल. कोरोनाबाधितही लवकर बरे होतील. आपतर्फे देशाच्या विविध भागात ही योजना आम्ही राबविणार आहोत, असे केजरीवाल म्हणाले.
देश कोरोनामुक्त होईल, अर्थव्यवस्थाही सुधारेल
या देशाचे भवितव्य अंधारात नाही तर या देशाला उज्ज्वल भवितव्य आहेच, असे सांगताना केजरीवाल यांनी कोरोनाचा फैलाव आता यानंतर नियंत्रणात येईल. देश कोरोनामुक्तही होईल. थोडा वेळ लागेल. परंतु जनतेने स्वत:साठी नियम लागू केले तर देश कोरोनामुक्त लवकर होईल. सध्या देशाची अर्थव्यवस्था हाललेली आहे. कारण कोरोनाचा वाढता फैलाव, सर्वच उद्योग बंद पडलेले. आज केंद्राने राज्य सरकारांना जीएसटीद्वारे महसुलही दिलेला नाही. राज्य सरकारच्या अडचणी वाढलेल्या आहेत. राज्य सरकारकडे सरकारी कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठीही देखील पैसे नाहीत. अशावेळी केंद्र सरकारने राज्यांना मदत करणे हे कर्तव्य तर आहेच. शिवाय कायद्यानेच ते निश्चित केलेले आहेत. परंतु केंद्र सरकारची आर्थिक स्थिती देखील डबघाईला आलेली आहे. कोरोनाने सर्वांचेच कंबरडे मोडलेले आहे. देशाची आर्थिक स्थिती देखील कालांतराने मजबूत होईल, अशी आशा केजरीवाल यांनी व्यक्त केली.
गोव्याच्या जनतेला चांगले सरकार देणार
नवी दिल्लीत आम्ही जनतेला स्वच्छ सरकार दिले. परिणामी जनतेने ‘आप’ला निवडून देताना दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या सर्व दिग्गजांना घरी पाठविले. विरोधकांची संख्या एकेरी झाली. सरकार माझे नाही. दिल्लीतील जनतेचे सरकार आहे. जनता चालवितेय हे सरकार. गोव्याला या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या जोखडातून आम्हाला सोडवायचे आहे. आम्ही गोव्याला स्वच्छ, भ्रष्टाचार विरहित सरकार देणार आहोत. जनता आमच्या पाठिशी राहील. कारण जनता या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना कंटाळलेली आहे. आगामी सरकार हे आपचे असेल, असे निवेदन केजरीवाल यांनी केले. जशा नवी दिल्लीतील जनतेला सुविधा दिल्या तशाच सुविधा आम्ही गोव्यातील जनतेला देखील देऊ. कारण भ्रष्टाचारच संपुष्टात आला तर सरकारचे कितीतरी हजारो कोटी रुपये वाचतील. आम्हाला गोव्यात नेमके हेच करायचे आहे. गोमंतकीय जनतेच्या मनात हळूहळू ‘आप’चा प्रभाव पडेल. दोन्ही राष्ट्रीय पक्षांना सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी ‘आप’ गोव्यात स्वच्छ उमेदवार देईल, असे केजरीवाल म्हणाले.