‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’च्या दुसऱया टप्प्यासाठी कराड पालिकेचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी/ कराड
राज्य शासनाने कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम’ राबवली आहे. या मोहिमेच्या दुसऱया टप्प्यास प्रारंभ केला आहे. ही मोहीम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कराड पालिकेने अभिनव उपक्रम राबवला आहे. पालिकेच्या पुढाकाराने तृतीयपंथियांचा श्री. रेणुकादेवी ग्रुप जनजागृतीसाठी शुक्रवारी रस्त्यावर उतरला आहे. शहरात जनजागृती करत कोरोनाला हद्दपार करण्याचे आवाहन केले.
मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. येथील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जनजागृती रॅलीला प्रारंभ झाला. रेणुका गुप, मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अधिकारी आर. डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, वरिष्ठ मुकादम मारूती काटरे यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व मुकादम उपस्थित होते.
कोल्हापूर नाक्यापासून रॅली सुरू झाली. पोपटभाई पेट्रोलपंपासमोरच्या सिग्नलवर रेणुका गुपने जनजागृती केली. कोरोनाशी लढण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. दुसऱया टप्प्यात आरोग्य कर्मचारी पुन्हा घरभेटी देणार आहेत. यावेळी नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱयांना खरी माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.