तामिळनाडू/प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांचे वेळापत्रक जाहीर केले. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तारखेची शुक्रवारी घोषणा झाल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज (शनिवार) थुतूकुडी येथे पोहचले आहेत. यावेळी त्यांच्या समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी तेथील व्हीओसी महाविद्यालयात बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी सरकार घटनात्मक संस्थांना उध्वस्त करत आहे त्यामुळे लोकांना संसद व न्यायपालिकेवर विश्वास राहिलेला नाही. अस राहुल गांधी म्हणाले.
“मागील सहा वर्षापासून देशाला एकसंध बनवून ठेवणाऱ्या सर्व निवडक संस्था व फ्री प्रेसवर पद्धतशीर हल्ला सुरू आहे. लोकशाही अचानक मरत नाही, ती हळूहळू मरते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संस्थात्मक संतुलन नष्ट केलं आहे.” असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
तसेच, “न्यायपालिका तसेच संसदेतही महिला आरक्षणासाठी माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. प्रत्येक जागी, भारतीय पुरुषांनी भारतीय महिलांकडे सारख्याच दृष्टीकोणातून पाहण्याची गरज आहे, ज्या दृष्टीने ते स्वतःकडे पाहतात.” असं देखील राहुल गांधी यांनी बोलून दाखवलं.
.