नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात करोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भारतात कोरोना विषाणूचा प्रसार सर्वाधिक वेगाने होईल असा समज आंतरराष्ट्रीय पातळीवर वर्तवला जात होता. मात्र, देशवासियांनी लॉकडाऊनच्या काळात दिलेल्या प्रतिसादामुळे आज भारतातील स्थिती उत्तम आहे, असे पंतप्रधान म्हणाले. डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटन यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त केरळमध्ये आयोजित कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केले.
कोणाचाही मृत्यू होणे दुर्दैवीच आहे. मात्र कोरोनाची संकट विश्वव्यापी आहे. या संकटावरही भारतीय जनतेने मात केली आहे. देशात एक दशलक्ष लोकसंख्येमागे 12 मृत्यूंची नोंद आहे. याउलट इटलीमध्ये हाच दर एक दशलक्ष लोकसंख्येमागे पाचशेहून अधिक असल्याचे मोदी म्हणाले. भारतीय जनतेच्या सहकार्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. आता नजिकच्या काळातही आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाचा संसर्ग असेपर्यंत सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करावाच लागेल, असेही मोदी म्हणाले.
संविधान हा आमचा मार्गदर्शक
भारतीय राज्यघटना हा सरकारचा मार्गदर्शक आहे. संविधानाच्या आदर्शामुळेच देशात लिंग, जाती, पंथ याबाबत भेदभाव केले जात नाहीत, असेही त्यांनी सांगितले. आताचे सरकारही कोणतेही सोयीस्कर निर्णय घेण्यात दंग नसून जनहित पाहूनच निर्णय घेतले जात नसल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहितीही दिली. आपल्या सरकारच्या काळात 8 कोटींहून अधिक कुटुंबांना स्वयंपाकघरातील धुरापासून मुक्त करत गॅसजोडण्या दिल्या गेल्या. बेघरांना आश्रय देण्यासाठी दीड कोटीहून अधिक घरे उभारण्यात आली. तसेच लोकांच्या आरोग्यासाठी ‘आयुष्यमान भारत’सारखी आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाणारी योजना लागू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.