तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
स्मार्ट सिटी प्रशासनाने नियोजनशून्य कारभाराचा कळस गाठल्यामुळे अवघ्या सोलापूरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यातून वाहने चालविण्याची कसरत करून वाहनधारकांचे कंबरडे मोडण्याची वेळ येऊन, अनेकांना मणक्याचे विकार जडले. नागरिकांची बोंब त्याचबरोबर प्रसारमाध्यमांतून स्मार्ट सिटीच्या कारभाराचे वाभाडे निघत असतात. याचा गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनावर काहीच परिणाम होत नाही. सोलापूरकरांच्या या मूक आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी आणि स्मार्ट सिटी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी संभाजी आरमारने रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी दुपारी सात रस्ता येथील नियोजन भवनाच्या इमारतीतील स्मार्ट सिटीच्या कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने उग्र निदर्शने करण्यात आली.
संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये स्मार्ट सिटी प्रशासनाच्या निषेधाच्या आणि ढिम्म अधिकाऱ्यांच्या धिक्काराच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे म्हणाले की, स्मार्ट सिटी योजनेमध्ये सोलापूरचा समावेश झाल्यानंतर शहराचा कायापालट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्या स्मार्ट सिटीचा कारभार बघितला तर शहराचा पूर्ण बट्ट्याबोळ झाला असून प्रशासनाच्या नियोजनशून्य गलथान कारभाराचा फटका शहरवासीयांना बसत असून स्मार्ट सिटी कामाने निर्माण झालेली धूळ आणि खड्डे यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांनी येणाऱ्या काळात स्मार्ट सिटीच्या कारभारात सुधारणा होऊन सोलापूरकरांची त्रासातून मुक्तता झाली नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांना धुळीने अंघोळ घालणार असल्याचा इशारा दिला.
याप्रसंगी निवेदन स्वीकारण्यास आलेल्या पालिका आयुक्तांचे स्वीय सहाय्यक राहुल कुलकर्णी यांना आंदोलकांनी धारेवर धरत येणाऱ्या काळात शहर स्मार्ट होण्यापूर्वी तुमचा कारभार स्मार्ट करा, असा दम भरला. या आंदोलनात कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, संजय सरवदे, शहर संघटक अनिल छत्रबंद, सचिव राहुल यमगर, उपशहरप्रमुख संतोष कदम, महिला आघाडीच्या शोभा घंटे, विद्यार्थीप्रमुख सोमनाथ मस्के, उपशहरप्रमुख नितीन पेंटर, प्रभागप्रमुख राज दवेवाले, विकी ठेंगले, मल्लिकार्जुन पोतदार, गणेश ढेरे, सचिन लंगाळे, प्रमोद जगताप, विक्रांत शिंदे, प्रकाश एकल, करण दवेवाले, शिवलाल जाधव, गणेश घरगडे, सुनील सरवदे, राहुल अटटेलूर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.