ऑनलाईन टीम / मुंबई :
जोरदार पावसाने कोकणात हाहाकार माजवला आहे. महापुराने चिपळूण पार उद्ध्वस्त झाले. लोक अन्न पाण्यावाचून तडफडत आहेत; मोठ्या संकटात सापडले आहेत. एकविरा मंदिर परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना एका वयोवृध्द महिलेचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची प्राथमीक माहिती आहे. तर अनेकजण पाण्यात बुडाल्याचे वृत्त आहे. दरम्यान चिपळूणचे नागरिक संकटात असतांना पालकमंत्री अनिल परब पळ काढतात, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.
त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी 8 कोविड रूग्ण दगावले, अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात, अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळकुटे मंत्री आहेत, अशी संतापजनक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
- मुख्यमंत्र्यांवर टीका
यापूर्वी चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत मुंबईवरुन पंढरपूरला गेले होते. त्यांच्या ड्रायव्हिंगवरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. हाच धागा पकडत संपूर्ण कोकण पुराच्या पाण्यात असताना आणि लोकांना शासनाच्या मदतीची गरज असताना मुख्यमंत्री गाडी चालवून कोकणच्या दिशेने जाणार का?, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला होता.