वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्थिक व्यवहारांसाठी राष्ट्रीय मिशनच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेली पंतप्रधान जनधन (पीएमजेडीवाय) या योजनेला आता सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत जवळपास 40.35 कोटी भारतीयांनी लाभ घेतला असल्याचे वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2014 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्यसाधत जनधन योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी या योजनेला मूर्त स्वरुप देत सादरीकरण करण्यात आले होते.
केंद्र सरकाने लोकांवर आधारीत असणाऱया केंद्राच्या आर्थिक योजनांचा पुरवठा व लाभ देण्यासाठी या योजनेचा वापर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. याचाच आधार घेत कोविडच्या काळासोबत नागरिकांना पीएम किसान, मनरेगा, आणि जीवन तसेच आरोग्य विमा आदींचा थेट लाभ देण्यासाठी बँक खाते प्रथम देण्यात आल्याचे वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.
खात्यांमध्ये 1.31 लाख कोटी
वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार पीएमजेडीवाय खात्यांमध्ये सध्या 1.31 लाख कोटी रुपये जमा असल्याची माहिती दिली आहे. सरासरी एका खात्यामध्ये 3,239 रुपये जमा असल्याचे स्पष्ट केले आहे. पीएमजेडीवाय वित्तीय समावेश होणाऱया घटकांसाठी राष्ट्रीय मिशनची आखणी करण्यासाठी वापरण्यात आली आहे. म्हणजे सदर योजनेच्या आधारे बचत, मुदत बंद खाते, पेडिट, इन्शुरन्स, पेंशन यासारख्या वित्तीय सेवा लाभ घेण्यास सोपे होणार अल्याचेही अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.