आमदार चर्चिल आलेमाव यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी / मडगाव
जनमत कौल दिनानिमित्त नुकत्याच लोहिया मैदानावर झालेल्या जाहीर सभेस आयोजकांकडून आपणास आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे आपण सभेला उपस्थिती लावू शकलो नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाणावलीतील आमदार चर्चिल आलेमाव यांनी दिले आहे. मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सदर स्पष्टीकरण दिले. यावेळी बाणावली मतदारसंघातील आजी-माजी सरपंच व पंच उपस्थित होते.
सदर बैठकीला उपस्थित राहिलो नसल्याने आपल्याकडे विचारणा होऊ लागल्याने आपण हे स्पष्टीकरण देत आहे. प्रत्यक्षात सभेच्या आयोजकांनी आपणास आमंत्रित केले नव्हते तसेच यापूर्वी कोळसा वाहतूकविरोधी बैठकांना आपणास जेव्हा बोलविले गेले तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसविण्यात आले आणि बोलण्याची संधी दिली गेली नाही. लोहिया मैदानावरील सभेत अन्य नेत्यांना बोलावून भाष्य करू दिले गेले. आपणासही तसे करण्याची संधी मिळाली असती, तर आपल्या जनमत कौलाच्या संदर्भातील भावना आपण मांडल्या असत्या, असे आलेमाव यांनी नजरेस आणून दिले.
नवस फेडण्यासाठी वालंकिणीला गेलो होतो
आपण सभेपूर्वीच वालंकिणी सायबिणीच्या दर्शनाला सपत्नीक जाण्यासाठी तिकिटे आरक्षित केली होती. कोविडच्या संसर्गातून सायबीण मायच्या कृपेने ठीक झाल्याने नवस फेडण्यासाठी आपण वालंकणी येथे गेलो होतो, असे आलेमाव यांनी सांगितले. लोकांची व आयोजकांची आपण सदर बैठकीस उपस्थित राहिलो नसल्याबद्दल दिशाभूल होऊ नये यासाठी हे स्पष्टीकरण आपण देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनमत कौल चळवळीत आपला, वडिलांचा सहभाग
जनमत कौलाच्या चळवळीत जॅक सिकेरा यांच्यासोबत आपले वडील कार्यरत होते. आपलाही या चळवळीत सहभाग होता, असे त्यांनी सांगितले. जॅक सिकेरा यांचा पुतळा बाणावलीत उभारण्याबाबत काही जण विपरित प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशा लोकांना सिकेरा यांच्या कार्याची महती माहीत नाही. सिकेरा नसते, तर गोवा महाराष्ट्राचा एक भाग बनून राहिला असता, याचा पुनरुच्चारही आलेमाव यांनी यावेळी केला. गोव्यात कोळसा हाताळणी करण्याच्या विरोधात सर्व 40 ही आमदारांनी विधानसभा अधिवेशनात ठराव घ्यावा. यामुळे कोळसा प्रश्न निकालात निघेल, असे आलेमाव याप्रसंगी म्हणाले.