होळीपूर्वी रेल्वेकडून मोठा दिलासा ः
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना संकट काळात अनेक रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. अनेक रेल्वेगाडय़ा तर सुमारे 2 वर्षांपासून बंद आहेत. अशा स्थितीत आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर रेल्वेने प्रवाशांना होळीपूर्वी मोठी भेट दिली आहे. 1 मार्चपासून सर्व रेल्वेगाडय़ांमध्ये अनारक्षित डब्यांमध्ये पूर्वीप्रमाणेच व्यवस्था असणार आहे. या आदेशानुसार आता रेल्वेगाडय़ांना लवकरच अनारक्षित डबे जोडले जाणार आहेत.
रेल्वेच्या या प्रयत्नामुळे सर्वाधिक लाभ उत्तर भारत आणि पूर्व भारताच्या लोकांना होणार आहे. होळीच्या सणानिमित्त स्वतःच्या गावी जाणाऱया लोकांना रेल्वेने जनरल डब्यांमध्ये जुनी व्यवस्था बहाल करण्याचा निर्णय घेत मोठी भेट दिली आहे. सर्व रेल्वेगाडय़ांना पूर्वीप्रमाणेच सुरू करण्यात येणार आहे आणि जनरल डब्यांमध्ये जुनी व्यवस्था बहाल करण्यास मंजुरी देण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्वतःच्या आदेशात म्हटले आहे.
प्रवासी आता पूर्वीप्रमाणेच रेल्वेगाडीत जनरल तिकिट विकत घेत प्रवास करू शकतील. रेल्वेद्वारे प्रतिदिन लाखोंच्या संख्येत लोक प्रवास करतात. भारतीय रेल्वे त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान करते. कोरोना काळात रेल्वेने अनेक प्रकारच्या सुविधा स्थगित केल्या होत्या. परंतु आता स्थिती सुधारू लागल्याने रेल्वे पुन्हा या सुविधा सुरू करत आहे.
पॅसेंजर सुरू होण्याची शक्यता
तसेच रेल्वेने कोरोना महामारीदरम्यान रद्द करण्यात आलेल्या सर्व जुन्या रेल्वेफेऱया सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. प्रवाशांना आता जनरल तिकीट घेण्यास कुठल्याच समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. आता पूर्वीप्रमाणेच सर्व 16 हजार रेल्वे देशभरात धावतील, यात पॅसेंजर, मेल रेल्वे सामील असल्याचे रेल्वे बोर्डाच्या एका अधिकाऱयाने सांगितले आहे.