प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनासंदर्भात निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता कुठे सांस्कृतिक कार्यक्रमाना पुन्हा चालना मिळू लागली आहे. मात्र रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाटय़गृहात अनेक कार्यक्रम प्रस्तावित असताना येथील जनरेटर बंद पडून वातानुकूलन यंत्रणाच कोलमडण्याचे विघ्न उभे ठाकले आहे. नाटय़गृहाच्या दुरुस्तीसाठी कोटय़वधी रुपये खर्च करूनही यंत्रणा बंद असल्याने या ठिकाणी 24 एप्रिल रोजी नियोजित ‘संगीत ताजमहाल’ नाटकाचा प्रयोग रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.
नाटय़गृहात अनेकदा काही ना काही अडचण उभी राहते. नाटय़गृहाच्या वातानुकूलित यंत्रणेअभावी प्रचंड उकाडय़ाने अनेकदा कलाकार, प्रेक्षकांना घामाच्या धारात न्हावून निघावे लागले आहे. यासाठी नाटय़गृहामधील वातानुकूलन यंत्रणा बसवण्यात आली. ही यंत्रणा जनरेटरवर कार्यान्वित होते. मात्र हा जनरेटरच बंद पडल्यामुळे वातानुकूलन यंत्रणाही कोडमडल्याची बाब समोर आली. जनरेटर दुरुस्तीसाठी काही दिवसांचा अवधी लागणार असून तोपर्यंत तेथे कार्यक्रम सादर करणे व पाहणे दोन्ही त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे नाटय़गृहातील आगामी नाटय़प्रयोगांसमोरही प्रश्न उभा ठाकला आहे.
नाटय़गृहात 24 एप्रिल रोजी ‘संगीत ताजमहाल’ नाटकाचा प्रयोग नियोजित होता. पण जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तो रद्द करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी नगर परिषदेकडून देण्यात आले. या नाटकाची तिकीट विक्री 21 एप्रिलला सुरु होणार होती, पण हा प्रयोग रद्द करून जनरेटर सुस्थितीत आल्यावर नवीन तारीख जाहीर करण्यात येणार आहे. ऐनवेळी हा तांत्रिक बिघाड झाल्याने या नाटकाच्या कलाकारांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे.
बिघाड मार्गी लागण्यासाठी नगर परिषद प्रयत्नशील
नाटय़गृहातील वातानुकूलित यंत्रणा चालणाऱया जनरेटरमध्ये बिघाड झाला आहे. रत्नागिरीत जनरेटर दुरुस्तीची यंत्रणा नसल्यामुळे तो कोल्हापूरला पाठवण्यात आला आहे. जनरेटर दुरुस्त झाल्यावर स्थिती पूर्वपदावर येईल. यंत्रणेमध्ये होणारा तांत्रिक बिघाड कोणाच्याही हातात नसतो. पण हा बिघाड लवकरात-लवकर मार्गी लागण्यासाठी नगर परिषद प्रयत्नशील आहे. नाटय़गृहात नाटय़प्रयोग व इतर कार्यक्रम पाहताना रसिकांची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष दिले जात आहे.
– तुषार बाबर,
मुख्याधिकारी, रत्नागिरी नगर परिषद
देखभाल–दुरूस्ती वेळीच करणे गरजेचे
सावरकर नाटय़गृहातील वातानुकूलित यंत्रणेची देखभाल-दुरूस्ती संबंधित अधिकाऱयांनी वेळच्या वेळी करणे गरजेचे आहे. जेणेकरून एखादय़ा नाटय़संस्थेला नाटय़गृहातील यंत्रणेत बिघाडामुळे प्रयोग रद्द करावे लागणार नाहीत. यासाठी लवकरात-लवकर बिघाड दूर करण्यात यावा.
– श्रीनिवास जोशी,
खजिनदार–खल्वायन रत्नागिरी