नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचा आरोप; ठराव रखडल्याने विशेष सभा काढली
प्रतिनिधी / कराड
येथील पालिकेच्या कालच्या विशेष सभेमध्ये आम्ही गावच्या विकासाचे व पालिका कर्मचाऱयांचे महत्त्वाचे विषय घेतले होते. परंतु जनशक्ती आणि लोकशाही या दोन्ही आघाडय़ांना गावच्या विकासापेक्षा स्वतःचा अहंपणा महत्त्वाचा वाटतो. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. यामुळे गावच्या विकासाची कामे ठप्प होत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही, असा आरोप नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, बुधवार 7 रोजी कराड नगरपरिषदेची विशेष सभा बोलावली होती. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी सभेला केलेला विरोध कायदेशीरदृष्टय़ा चुकीचा होता. जोपर्यंत पूर्वी झालेल्या मिटींगचे प्रोसिडिंग लिहून पूर्ण होत नाही, तोपर्यंत सर्वसाधारण सभा घेता येत नाही. 19 जानेवारीला मागील सभा पार पडली. या सभेत 148 विषय होते, यापैकी 106 ठरावच माझ्या सहिला आले. राहिलेल्या ठरावांसाठी वेळोवेळी मिटींग क्लार्क यांना लेखी व तोंडी सूचना केल्या आहेत. पत्रही दिले आहेत पण आजतागायत राहिलेले ठराव माझ्या सहीसाठी आलेले नाहीत, त्यामुळेच मी विशेष सभा काढली, असे स्पष्टीकरण नगराध्यक्षांनी पत्रकात दिले आहे.
जनशक्ती व लोकशाही आघाडीने ठरवून या ऑनलाईन सभेमध्ये दंगा करून विघ्न आणायचे हे आधीच ठरवले होते. त्यामुळे हे दोन्ही गट सभा ऑनलाइन काढली असतानासुद्धा शासनाच्या कोरोनाच्या नियमांना धाब्यावर बसवून नगरपरिषद मिटिंग हॉलमध्ये क्रीन लावून बसले होते. विषय पत्रिका निघून बरेच दिवस होऊनसुद्धा सदर कालावधीत या विशेष सभेबद्दल कोणीही हरकत घेतली नाही. परंतु गेल्या काही सभांमध्ये फक्त गोंधळ घालून सभा चालूच द्यायच्या नाहीत, असे धोरण दोन्ही आघाडय़ांनी ठरवले होते. त्यामुळेच आम्ही सदर मिटिंग रद्द करण्यास होकार दिला. नेहमीप्रमाणे सभा होऊ द्यायचीच नाही, हे ठरवूनच ते सर्वजण मिटींगला आले होते. कायद्यानुसार नगराध्यक्षांना विशेष सभा बोलण्याचा अधिकार आहे. वाटेगावकर यांनी कायदा संपूर्ण वाचावा अर्धवट वाचून चुकीची माहिती सभागृहाला देऊ नये.
आम्ही गेली पंधरा दिवस ग्राउंड लेव्हलवर काम करीत आहोत. मात्र नगरसेविका हुलवान व त्यांचे सहकारी मागच्या कोरोनाच्यावेळी व यावेळी सुद्धा कोठे आहेत. ज्येष्ठ नगरसेवक पावसकर यांनी चर्चा करून सोमवार पेठेमध्ये लसीकरण केंद्राची मागणी करून सदर केंद्र चालू केले. मी स्वतः शनिवार पेठ मध्ये लसीकरण केंद्राची मागणी करून पत्रकार भवन येथे लसीकरण केंद्र चालू करून घेतले आहे.या शिवाय नागरी आरोग्य केंद्र येथे सुरु असलेल्या लसीकरणासाठी आवश्यक असणारी सर्व साधनसामुग्री तेथे पोहोच होऊन लसीकरण प्रत्यक्ष सुरळीत सुरु होईपर्यंत सलग 3 दिवस मी त्या ठिकाणी थांबून होते. या प्रक्रियेत आपण कुठे होता? याचे आत्मपरीक्षण हुलवान व त्यांच्या सहकाऱयांनी करणे गरजेचे आहे.
काही नगरसेवकांच्या गोंधळामुळे नकारात्मक प्रतिमा कालची सभा ही कोणाच्याही दबावाखाली रद्द केली नसून सभेमध्ये काही कारण नसताना काही जणांच्या विनाकारण गोंधळामुळे शहरात सदस्यांच्या बाबतीत चुकीची व नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे, हे होऊ नये, यासाठी सभा रद्द केली आहे, असेही नगराध्यक्षांनी म्हटले आहे.