प्रगतीचे श्रेय कार्यकर्त्यांना – पंतप्रधान मोदी यांचे भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भाजपच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सर्वसामान्य माणसाच्या संपर्कात राहण्याची आवश्यकता आहे. जनसंपर्क हेच भाजपचे खरे बलस्थान आहे. काही महिन्यांमध्ये होत असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बलस्थान आपण अधिक भक्कम केले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे आयोजित भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत केले.
भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची एकदिवशीय बैठक येथे पार पडली. या बैठकीचे आयोजन पक्षाच्या मुख्यालयात करण्यात आले होते. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, सर्व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. भाजपचे बहुतेक मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नंतर पत्रकारांना बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.
भाजप एककुटुंबी पक्ष नाही
भाजप हा एका कुटुंबाच्या नेतृत्वातील किंवा एका कुटुंबाच्या आधीन असणारा पक्ष नाही, हा इतर बहुतेक सर्व विरोधी पक्ष आणि भाजपमधील सर्वात महत्वाचा भेद आहे. ही स्थिती भाजप कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची आहे. कुटुंबाचे वर्चस्व नसल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांनासुद्धा उच्च पदांवर पोहचण्याची संधी मिळते. पक्षाची आजवरची प्रगती हे कार्यकर्त्यांच्या अथक आणि कठोर परिश्रमाचे फळ आहे. भाजपचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनता आणि सत्ताधीश यांच्यात अतूट दुव्याचे काम करतात. हेच काम त्यांनी अधिकाधिक जोमाने करावे. त्यात पक्ष आणि कार्यकर्ते यांचे हित आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.
कोरोना काळात सेवारत
भाजपच्या देशभरातील लक्षावधी कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या भीषण उद्रेकांमध्ये लोकांना अनमोल सहाय्य केले आहे. लोकांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून तन, मन आणि धन अर्पून कार्य केले. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपयुक्तता तळागाळापर्यंत समजून आली आहे. हेच कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंजाबमध्ये सर्वजागी लढणार
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांमध्येच होत आहेत. या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजप किंवा रालोआची सरकारे आहेत. ही सर्व राज्ये पुन्हा जिंकण्याचा आमचा निर्धार असून तो यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंजाबमध्ये भाजप सर्व जागा लढविणार असून तेथील भरीव कामगिरी केली जाईल. कार्यकर्ते त्याही राज्यात आतापासूनच कामाला लागले आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पश्चिम बंगालमध्ये इतिहास घडविणार
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप पश्चिम बंगालमध्ये इतिहास घडविणार असून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे ध्येय आहे, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सकाळच्या सत्रात केले. या राज्यात निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारात भाजपचे अनेक कार्यकर्ते मारले गेले. तसेच अनेकांच्या घरांची हानी झाली. भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व काहीही विसरले नसून संबंधितांना याचे उत्तर द्यावे लागेल, असे विधानही त्यांनी केले.
मतदानकेंद्र पातळीवर कार्य
भाजपने ‘पन्ना प्रमुख’ ही संकल्पना आचरणात आणली आहे. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये याच संकल्पनेच्या आधारे मतदानांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मतदारसूचीचे प्रत्येक पान एका कार्यकर्त्याच्या हाती दिले जाणार असून त्या पानावर असलेल्या मतदारांशी त्याने संपर्क करणे, असे या पन्ना प्रमुख संकल्पनेचे सूत्र आहे. लोकांच्या जीवनाशी निगडीत असणाऱया मुद्दय़ांवर भाजपचे वचनपत्र आधारित राहणार आहे.
अठरा मुद्दय़ांचा राजकीय प्रस्ताव
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यकारिणी बैठकीत 18 मुद्दय़ांचा राजकीय प्रस्ताव सादर केला. भाजपच्या तामिळनाडू शाखेचे अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. या प्रस्तावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची कामगिरी, विविध क्षेत्रांमध्ये या सरकारने साकारलेली कामे आणि भविष्यकालीन योजना यांचा समावेश प्रामुख्याने आहे. तसेच विरोधकांच्या नकारात्मक आणि कोरोना काळात जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याच्या भूमिकेवर कठोर टीकाही करण्यात आली आहे. हा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. या प्रस्तावावर केंद्रीय मंत्री किशन रेड्डी आणि अश्विनी वैष्णव, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. विरेंद्र सिंग आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी या प्रस्तावावर त्यांची मते व्यक्त केली.
शीख समुदायासाठी विशेष प्रयत्न
देशाच्या प्रगतीत शीख समुदायाने केलेले अमूल्य योगदान भाजपने सन्मानपूर्वक विचारात घेतले असून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात या समुदायासाठी विशेष योजना आणल्या आहेत. 1984 च्या शीखविरोधी दंगलींमधील आरोपींविरोधातील प्रकरणे नेटाने चालविली आहेत. गुरुद्वारांना विदेशी अर्थसाहाय्य मिळवून देणे तसेच लंगरना जीएसटीच्या बाहेर ठेवणे असे निर्णय घेतले आहेत. पंजाबमध्येही आपला पक्ष स्पृहणीय यश मिळवेल असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला.
आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल
कोरोना काळाच्या प्रारंभी भारतासमोर मोठेच संकट उभे राहिले होते. साधे मास्कसुद्धा भारतात निर्माण होत नव्हते. तथापि, आव्हान समोर ठाकल्यानंतर या सर्व वस्तू भारतात तयार होत आहेत. गरिबांसाठी याच कोरोना काळात जगातील सर्वात मोठी विनामूल्य धान्य योजना लागू करण्यात आली, जिचा 80 कोटी गरिबांना लाभ मिळाला. आता अर्थव्यवस्था सुधारत असून जीएसटी संकलनात मोठी वाढ दिसून येत आहे. यांचा आढावा बैठकीत घेण्यात आला आहे.
निवडणुकांचे फुंकले रणशिंग
ड भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकांचे फुंकले रणशिंग
ड आतापर्यंतच्या कार्यांचा आढावा, भविष्यकालीन योजनांवर दिला मोठा भर
ड 18 मुद्दय़ांचा राजकीय प्रस्ताव संमत, विरोधकांच्या नकारात्मकतेवर टीका
ड कोरोनाकाळात पक्ष कार्यकर्त्यांच्या जनहित कार्याचे कार्यकारिणीत कौतुक