उपराष्ट्रपती व्यकय्या नायडू यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन : राज भवनातील अत्याधुनिक दरबार हॉलचे लोकार्पण
प्रतिनिधी /पणजी
सार्वजनिक जीवनात प्रति÷ा, नैतिकता, तत्वे जपली पाहिजेत तसेच जनादेशाचा आदर करण्यासाठी संयम बाळगला पाहिजे. त्यासाठीच लोकप्रतिनिधींनी संसद आणि विधामंडळाचा दर्जा व प्रतिष्ठेचे रक्षण करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. त्याचबरोबर भारताला समृद्ध राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्नरत राहण्याची गरज व्यक्त केली. तसेच केंद्र सरकारने सुरू केलेल्या आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दोना पावला येथील राजभवन परिसरात सुमारे 18 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक दरबार हॉलचे उद्घाटन केल्यानंतर श्री. नायडू बोलत होते. त्यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आदी मान्यवरांची उपस्थिती होती
भाषणाची सुरुवात कोकणीतून
’’गोंयच्या म्हज्या भावानो आनी भयणींनो, तुमकां सगल्यांक म्हजो नमस्कार. आधुनिक अशा सभाघराचें उक्तावण करतना आयज म्हाका खोस भोगता’’, अशा कोकणी शब्दांतून श्री. नायडू यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. दरबार हॉलच्या वैशिष्टय़पूर्ण बांधकामाची प्रशंसा करताना नव्या सरकारचा शपथविधी याच हॉलमध्ये होईल, असे श्री. नायडू यांनी सांगितले.
आझादी का अमृत महोत्सव सारख्या कार्यक्रमात लोकांचा सहभाग विकासाची गती वाढवण्यास आणि विविध क्षेत्रांमध्ये आवश्यक सुधारणा घडवून आणण्यास मदत करेल. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही देशासमोर गरिबी, निरक्षरता, प्रादेशिक विषमता, सामाजिक आणि लैंगिक भेदभाव यांसारखी आव्हाने आजही आहेत. या पाच आव्हांनाना तोंड द्यायचे असेल तर निरक्षरता निर्मुलन, प्रत्येकाचा आर्थिक विकास, महिलांचे सबलीकरण करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. हे एक आव्हान म्हणून प्रत्येकाने स्वीकारले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.
गोव्याबद्दल नेहमीच आदराचे स्थान
सांस्कृतिक आणि भाषिक वैविध्य, निसर्गरम्य वैभव तसेच लोकांचा प्रेमळपणा आणि आदरातिथ्य यामुळे माझ्या हृदयात गोव्याबद्दल नेहमीच एक विशेष स्थान आहे. गोव्याचे निसर्गसौंदर्य, विस्तीर्ण वनराई, वनस्पती व प्राणी यांची विविधता आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यामुळे हे राज्य भारतातील पर्यटन स्थळांमध्ये अव्वल स्थानावर आहे.
गोव्याला निरोगी सामाजिक-राजकीय संस्कृती
नैसर्गिक सौंदर्यासोबतच गोव्याला एक निरोगी सामाजिक-राजकीय संस्कृती देखील लाभली आहे, असे सांगून नायडू यांनी गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि भाषिक, साहित्यिक वारसा जतन करण्याचे आवाहन केले. गोव्याची संस्कृती, सण आणि येथील पारंपारिक पाककृतीतील समृद्ध वैविध्य जपण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
गोव्याची वास्तुकला प्रतिबिंबित करणारे बांधकाम
माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या कार्यकाळात दरबार हॉलच्या बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला होता. तेव्हापासून आपल्या प्रत्येक गोवा भेटीत या प्रकल्पाच्या प्रगतीचा पाठपुरावा करत होतो. गोव्यातील अनोखी वास्तुकला प्रतिबिंबित करणारे असे या इमारतीचे बांधकाम आहे. आकारमानाने ती डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमनंतर दुसऱया क्रमांकाची ठरली आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर भारताने रेल्वे, हवाई कनेक्टिव्हिटी यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. मात्र तेवढय़ाच कर्तृत्वावर आत्मसंतुष्ट न राहता देश समृद्ध करण्यासाठी सतत प्र्रयत्नशील राहिले पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
गोव्यातील गावे शहरांपेक्षांही सुंदर
राज्यपाल श्री. पिल्लई यांनी आपल्या अभिभाषणात आपण राज्यातील अनेक गावांच्या केलेल्या दौऱयांचा उल्लेख करताना, गोव्यातील गावे येथील शहरे आणि समुद्रकिनाऱयांपेक्षाही सुंदर आहेत, असे सांगितले. 2019 मध्ये दरबार हॉलच्या निर्मितीपासून तो पूर्ण करून उद्घाटन होईपर्यंत माजी राज्यपाल स्व. मृदुला सिन्हा, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर आणि विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या योगदानाची आठवण करून दिली. तसेच दरबार हॉलची ही प्रति÷ित वास्तू राज्याच्या विकासाचा आणि जनतेच्या कल्याणाचा नवा टप्पा गाठेल, असे सांगितले.
मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी प्रकल्पाच्या ठळक वैशिष्टय़ांची माहिती दिली. 2200 चौ.मीटर क्षेत्रफळात बांधकाम करण्यात आलेल्या या प्रकल्पात 600 पेक्षा जास्त लोक बसू शकतात असे सांगून निर्धारित तारखेच्या दोन महिने अगोदरच दरबार हॉलचे बांधकाम पूर्ण केल्यबद्दल त्यांनी कंत्राटदाराचे अभिनंदन केले.
विविध मान्यवरांचा गौरव
दरबार हॉलच्या बांधकामासाठी दिलेल्या योगदानाबद्दल याप्रसंगी उपराष्ट्रपतींनी माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर, पीडब्ल्यूडी मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, मुख्य वास्तुविशारद मर्विन गोम्स, आर्किटेक्ट प्रशांत देसाई, वास्तुविशारद सुरुची शिरोडकर आणि कंत्राटदार व्हिन्सेंट डी कॉस्टा यांचा गौरव केला. राज्यपालांचे सचिव आर. मिहीर वर्धन यांनी स्वागत केले. मर्विन गोम्स यांनी आभार मानले.