प्रतिनिधी/ पणजी
जिल्हा पंचायतींच्या माध्यमातून नशीब आजमावणाऱया 200 उमेदवारांमधील 48 जणांना आज मतदारांकडून लॉटरी लागणार असून निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना ’झेडपी’ अशी नवी ओळख प्राप्त होणार आहे. पक्षीय पातळीवर झालेल्या या निवडणुकीत जनमताचा कौल नक्की कोणत्या पक्षाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता लोकांना लागली असून सायंकाळपर्यंत ते चित्र स्पष्ट होणार आहे. सांकवाळचा झेडपी यापूर्वीच बिनविरोध विजयी झालेला आहे.
राज्यातील जिल्हा पंचायतीच्या 48 मतदारसंघांसाठी शनिवार दि. 12 रोजी मतदान झाले होते. कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शांततापूर्ण वातावरणात झालेल्या या निवडणुकीत 56.82 टक्के लोकांनी मतदान केले होते. त्याद्वारे 200 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले होते. आज दि. 14 रोजी मतमोजणी होणार असून प्रत्येक उमेदवाराच्या नशिबाचा फैसला जाहीर होणार आहे.
राज्यभरात 15 ठिकाणी होणार मतमोजणी
मतमोजणीसाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे 15 केंद्रे अधिसूचित करण्यात आली आहेत. कांपाल येथील इनडोअर स्टेडियम, वाळपईतील वन प्रशिक्षण विद्यालय सभागृह, पेडे येथील इनडोअर स्टेडियमची बॉक्सिंग व बॅडमिंटन सभागृहे, पेडणेतील संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय, डिचोलीतील नारायण झांटय़े महाविद्यालयातील जिमखाना सभागृह, मडगाव येथील माथानी साल्ढाणा जिल्हा प्रकल्पातील दोन सभागृहे, सांगे येथील सरकारी क्रीडा प्रकल्प, तामसडो धारबांदोडा येथील सरकारी प्राथमिक शाळा, बोरीमळ केपे येथील क्रीडा प्रकल्प, काणकोण येथील सरकारी महाविद्यालय, फर्मागुडी येथील आयटीआय संस्थेची इमारत आणि वास्कोतील मुरगाव पोर्ट इन्स्टिटय़ूट या केंद्रांचा त्यात समावेश आहे.
मतमोजणीस बराच वेळ लागण्याची शक्यता
सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. हे मतदान मतपत्रिकेद्वारे घेण्यात आले होते. त्यामुळे मतमोजणीस दिवसभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात एकेकाच्या नशिबाचा फैसला जाहीर होत राहणार आहे. या निवडणुकीत नशीब आजमावणाऱयांपैकी बरेच उमेदवार दुसऱयांदा Eिरगणात उतरले होते तर अनेकांचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
राखीवतेमुळे विद्यमान झेडपींची दुसरी संधी हुकली
अनेक विद्यमान झेडपीनी दुसऱयांदा संधी मिळविण्याच्या हेतूने मतदारांच्या मनात स्वतःबद्दल चांगले मत निर्माण केले होते. परंतु त्यातील अनेकांचे मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांची संधी हुकली व नाऊमेद होण्याची पाळी आली. अन्य उमेदवारांमधील किती जणांना मतदारांनी दुसऱयांदा स्वीकारले आहे, किती जणांना नाकारले आहे आणि किती नव्या चेहऱयांना संधी दिली आहे ते चित्र आज स्पष्ट होणार आहे.
कोरोनामुळे बदललेले चित्र ठरले निवडणुकीचे वैशिष्टय़
एखादी निवडणूक झाल्यानंतर परंपरेने छापली जाणारी काही छायाचित्रे दुसऱया दिवशी प्रसिद्ध व्हायची. मतदान करणारे बडे राजकर्ते, वयोवृद्ध, अंथरुणाला खिळलेला तरीही कुटुंबियांनी खांद्यावरून उचलून किंवा अन्य माध्यमांतून मतदानासाठी आणलेले नागरिक, शारीरिक व्यंगामुळे व्हीलचेअरवर बसून आलेली व्यक्ती, प्रचंड गर्दी असलेले किंवा ओस पडलेले मतदानकेंद्र, यासारख्या छायाचित्रांचा त्यात समावेश असायचा. यंदा कोरोनामुळे मास्क किंवा पीपीई किट घातलेले मतदार/अधिकारी, एरव्ही सुरक्षेसाठी ’रायफल’ हाती घेऊन दिसणारे पोलीस थर्मल ’गन’ घेऊन तपासणी करतात, मतदारांच्या हातांना सेनिटायझर लावतात, यासारखी छायाचित्रे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्याने या निवडणुकीचे हे एक वैशिष्टय़ ठरले.
जिल्हा पंचायत निवडणुकीतच्या इतिहासात प्रथमच मतदानावर बहिष्कार
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच मतदानावर बहिष्कार घालण्याचा प्रकार घडला. विषय, मुद्दे, कारणे वेगवेगळी असली तरीसुद्धा चक्क दोन मतदारसंघातील मतदारांनी यंदा निवडणुकीवर बहिष्कार घातला. डिचोली तालुक्यातील सर्वण कारापूर जि. पं. मतदारसंघाच्या मावळिंगे प्रभागातील लोकांनी आपल्या मागण्या पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ मतदान केंद्राकडे पाठ केली. असाच प्रकार दक्षिण गोव्यातील म्हापा पंचवाडातील मतदारांनी केला. जमीन रुपांतरण, प्लॉट विकसित करण्याचे प्रकरण, मंदिर, स्मशानभूमी यासारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याच्या रागातून हा बहिष्कार टाकण्यात आल्याचे समजते.