प्रतिनिधी/ बेळगाव
सराफ गल्ली, शहापूर येथील एका शेतकऱयाने जनावरांना फ्लॉवरचा पाला घातला. हा कीटकनाशक औषध फवारणी केलेला पाला खाल्ल्यामुळे एक म्हैस दगावली तर तीन अत्यवस्थ झाल्या होत्या. यामुळे शेतकऱयाला जवळपास 1 लाखाहून अधिक रुपयांचा फटका बसला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. तेव्हा शेतकऱयांनी जनावरांची काळजी घेणे गरजेचे असून पाला स्वच्छ करूनच जनावरांना घालावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सराफ गल्ली येथील शेतकरी ज्ञानेश्वर सुब्राव चौगुले यांनी जनावरांसाठी बाजारातून चारा आणला. त्यामध्ये फ्लॉवरच्या पाल्याचा समावेश होता. त्या पाल्यावर कीटकनाशक औषध फवारणी झाली होती. मात्र, याबाबत कोणतीच माहिती नसल्यामुळे चौगुले यांनी तो पाला तसाच जनावरांना घातला. काही वेळातच चार म्हशी अचानक अत्यवस्थ झाल्या. त्यानंतर इतर शेतकऱयांनी आणि शंकर बाबलीचे यांनी वडगाव पशुवैद्यकीय केंद्राचे डॉक्टर विनयकुमार संग्रोळी यांना याची माहिती दिली.
तातडीने ते आणि त्यांचे साहाय्यक एस. एम. मुल्ला दाखल झाले. उपचार सुरू केले. मात्र त्यामधील एक म्हैस दगावली. तीन म्हशींवर उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी हतबल झाला आहे. जवळपास 15 लाख रुपयांचा फटका या शेतकऱयाला बसला आहे.
शेतकऱयांनो कोणताही पाला घालताना दक्षता घ्या
सध्या ओल्या चाऱयाची टंचाई आहे. त्यामुळे फ्लॉवर, नवलकोल, कोबी याचा पाला जनावरांना घालण्यात येत आहे. मात्र या सर्व पालेभाज्यांवर कीटकनाशक फवारणी केली जाते. असा पाला जनावरांना धोकादायक आहे. तेव्हा कोणताही पाला स्वच्छ करून घालावा. अन्यथा, नाहक मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.