जपानच्या पंतप्रधानपदाबाबत जे व्हायचे तेच झाले. राजीनामा देऊन पायउतार झालेले शिंझो आबे यांचे ‘उजवे हात’ म्हणून ओळखले जाणारे योशिहिडे सुगा यांच्या खांद्यावर पंतप्रधानपदाची झूल पांघरण्यात आली. जपानमधील पद्धतीनुसार लिबरल डेमोप्रॅटिक पक्षाच्या (एलडीपी) प्रमुख पदाच्या शर्यतीत अन्य स्पर्धकांचा दणदणीत पराभव करून सुगा यांनी 462 पैकी 314 मते जिंकली आणि पंतप्रधानपदाच्या खुर्चीत विराजमान झाले.
योशिहिडे सुगा हे नुकतेच पायउतार झालेले पंतप्रधान शिंझो आबे यांच्या खास मर्जीतले. या एकाहत्तर वर्षांच्या राजकारणपटूची जपानमध्ये प्रसिद्धी आहे ती राजकीय पटावरील सोंगटय़ा कौशल्याने खेळवण्यासाठी. अनेक वर्षे ते जपानच्या केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानपदाच्या खालोखाल महत्त्वाचे मानणारे मुख्य पॅबिनेट सेक्रेटरी हे पद सांभाळत होते. त्यांची पंतप्रधानपदावरील निवड जपानच्या कनिष्ठ सभागृहाच्या सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत काम करण्यासाठी झालेली आहे. या पदावरून कारभार करताना पूर्वीचेच धोरण पुढे चालू ठेवणार असे त्यांनी घोषित केले. म्हणजे आबे गेले तरी ‘आबेनॉमिक्स’ चालूच राहणार!
योशिहिडे सुगा हे ‘किसानपुत्र’ आहेत. जपानच्या उत्तरेकडील बर्फाळ प्रदेशातील एका लहानशा खेडय़ात एका स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱयापोटी ते जन्मले. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी टोकियो गाठले. आपल्याकडे मुंबई, पुणे, अहमदाबाद, कानपूर किंवा दिल्ली गाठण्यासाठी होतकरू तरुण मार्गस्थ होतात तसे! करिअरचा प्रारंभ त्यांनी एका पुठ्ठे बनवणाऱया कारखान्यात केला. चरितार्थासाठी कष्ट करण्याच्या धडपडीतूनच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. शिंझो आबे यांच्यासारखा राजकीय नेतृत्वाचा प्रदीर्घ वारसा सुगा यांच्या पाठीशी नाही. ‘एलडीपी’च्या एका खासदाराचा सचिव म्हण्tान त्यांनी कामाची सुरुवात केली. जपानमधले पत्रकार आणि राजकीय निरीक्षक यांच्या मते सुगा यांची राजकीय वाटचाल किंवा प्रगती तशी संथच झाली. म्हणजे त्यांनी 1996 साली ‘डाएट’ या मध्यवर्ती कनिष्ठ सभागृहाच्या सदस्यत्वाची (खासदारकी) निवडणूक जिंकली. खरे पाहता त्यावेळी ते सत्तेचाळीस वर्षांचे होते, आणि त्यापूर्वी 1987 पासून शहराच्या राजकारणातही त्यांनी प्रतिनिधित्व केलेले, परंतु राजकीय वारसा पाठीशी असता तर कदाचित आणखी काही वर्षे आधी ते खासदार झाले असते, असे जपान्यांना वाटते.
खासदार झाल्यापासून केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश होण्यासाठी सुगा यांना 9 वर्षे वाट पहावी लागली. सभागृहातील अनुभव आणि प्रगल्भतेच्यादृष्टीने हे ठीक असले तरी एव्हाना ते छप्पन्न वर्षांचे झाले होते. 2005 साली जुनिचिरो कोइझोमी यांच्या मंत्रिमंडळात सुगा प्रथम मंत्री बनले आणि त्यापाठोपाठ सत्तेवर आलेले शिंझो आबे यांच्या काळात सुगा हे जपानी राजकारण आणि सत्तेमधील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाऊ लागले.
कारकिर्दी नेहमीच अल्पायुषी
जपानमधील मंत्रिमंडळे आणि पंतप्रधानांच्या कारकिर्दी तशा नेहमीच अल्पायुषी ठरतात. स्थिर सरकार ही त्या देशात कित्येक वर्षे केवळ राज्यशास्त्राच्या पुस्तकातील कल्पना होती. 2007 साली शिंझो आबे पंतप्रधान झाले, पण वर्षभरातच आजाराच्या कारणाने त्यांनी पदत्याग केला होता. मात्र 2012 मध्ये ते निवडून आले आणि सलग 8 वर्षे टिकून राहिले. त्यावेळी राज्यशास्त्रातील ‘स्थिर सरकार’ ही कल्पना जपानी जनतेने प्रथमच अनुभवली. आबे यांनी पंतप्रधान व्हावे यासाठी प्रोत्साहन देणारे आणि सतत त्यांना मदत करणारे सहकारी सुगा हेच होते. धोरणाचे नाव जरी ‘आबेनॉमिक्स’ असले तरी त्याला आकार देण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात योशिहिडे सुगा यांचा सिंहाचा वाटा होता हे कोणीच अमान्य करत नाही.
शिंझो आबे यांनी जगभर मैत्रीसंबंध प्रस्थापित केले होते. भारताचे ते चांगले मित्र मानले जातात. त्या पार्श्वभूमीवर सुगा स्वतःच्या देशाचे नेतृत्व कितपत समर्थपणे करतील आणि परराष्ट्र धोरणावर कितीसा ठसा उमटवतील असे काही राजकीय चिकित्सक आणि पत्रकार बोलू लागले आहेत. त्यांनी पक्षांतर्गत निवडणूक जिंकली असेल, पण जनादेश मिळवण्याची खात्री त्यांच्याबाबत देता येईल का अशी शंकाही काहींनी व्यक्त केली. भारतीय संसदेत आबे यांनी केलेल्या ओघवत्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर, त्यांचे उत्तराधिकारी बनलेले सुगा श्रोत्यांचे कान तृप्त करणारे वक्ते नाहीत. कंटाळवाण्या सुरात, मधूनमधून बराच वेळ थांबत, बोजड शब्द वापरत केलेली त्यांची भाषणे श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत नाहीत, असे एक निरीक्षण आहे. नको असलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे सुगा टाळत असल्यामुळे जपानमधल्या पत्रकारांनी त्यांना ‘आयर्न वॉल’ (पोलादी भिंत) असे टोपणनाव ठेवले आहे.
‘स्ट्रीट स्पीचेस’ जपानमध्ये लोकप्रिय
या साऱयाची दुसरी बाजूही आहे. स्वतःकडे उत्तम कर्तृत्वकला नसली तरी आबे यांच्या कारकिर्दीत सुगा यांनी ‘स्ट्रीट स्पीचेस’ जपानमध्ये लोकप्रिय केली. सरकारी धोरणे आणि उद्दिष्टपूर्ती यांची जनतेला माहिती देण्यासाठी ही रस्त्यावरील भाषणे आयोजित केली जातात. रेल्वे स्थानकांचे फलाट या भाषणांसाठी जास्त प्रमाणात वापरले जातात. सुगा स्वतः प्रवाशांना प्रश्नावल्या वाटून जनतेची मते आजमावतात.
पत्रकारांना सामोरे जाण्यात काहीसा आखडता हात घेणाऱया सुगांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. सत्तरीतही दररोज शंभर दंड बैठका चुकत नाहीत. सकाळीच वृत्तपत्रे चाळून झाली की साडेसहा वाजता देशातील विविध क्षेत्रातील व्यक्तींसोबत त्यांच्या बैठका वगैरे सुरू होतात. सरकारी पदे आणि कार्यालये यांच्यासोबत येणारा स्वाभाविक मोठेपणा, बडे जाव यांचा त्यांना तिटकारा आहे, आणि जपानी नोकरशाहीत शिरलेला विभागीय अलिप्तपणा, हितसंबंध आणि अकारण जुन्या रीतींना चिकटून राहण्याचा दोष त्यांना निपटून काढायचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते जे काही करतात ते राष्ट्रासाठी असा त्यांचा लौकिक आहे, आणि जपानी जनतेच्या मनात ‘राष्ट्रा’इतके उच्च आणि श्रेष्ठ दुसरे काही नाही.
राजेंद्रप्रसाद मसुरकर, 9960245601