लहान मुलं हे भारताचे उद्याचे नागरिक आहेत. त्यामुळे ही पिढी जबाबदार असायला हवी. त्यांना इतरांच्या कामाची, मेहनतीची जाण असायला हवी. म्हणूनच मुलांवर लहानपणापासून घरातल्या काही कामांच्या जबाबदार्या सोपवता येतील. सध्या मुलांच्या शाळा बंद आहेत. मुलांकडे भरपूर वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग या पद्धतीने करता येईल.
- जेवण वाढण्याचं काम मुलांना फारसं महत्त्वाचं वाटत नाही. मुलं जेवण वाढल्यानंतर येतात आणि पटापट जेवून निघून जातात. मात्र सर्व खाद्यपदार्थ टेबलावर ठेवणं, जेवण वाढणं आणि नंतर टेबल स्वच्छ करणं हेही महत्त्वाचं काम आहे याची जाणीव मुलांना व्हायला हवी. त्यामुळे मुलांकडून अशी कामं करून घेता येतील.
- दिवसभराच्या कामाचं वाटप करून देता येईल. यासाठी यादी तयार करता येईल. प्रत्येक काम आणि त्यापुढे व्यक्तीचं नाव लिहिता येईल. पाण्याच्या बाटल्या भरणं, झाडांना पाणी घालणं, पसारा आवरणं, टेबल-खुर्च्यांवरची धूळ पुसणं अशी कामं देता येतील.
- आठवडय़ातल्या एखाद्या दिवशी म्हणजे रविवारी मुलं आणि मोठय़ांनी मिळून काम करा. घराची आवराआवर, साफसफाई असं काहीतरी करता येईल. कामं करता करता गप्पा मारा, गाणी म्हणा. कामात रंगत आणण्याचा प्रयत्न करा.
- मुलांना त्यांची कामं स्वतः करू द्या. कोणतीही वस्तू त्यांच्या हातात आणून देऊ नका. मुलांना ऑर्डर सोडण्याची सवय लावू नका. रिमोट, पाणी त्यांना स्वतः उठून घेऊ द्या. यामुळे त्यांना जबाबदारीची जाण होईल.