केदनूरच्या शेतकऱयांनी दिले जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या 60 ते 70 वर्षांपासून केदनूर येथील ती जमीन आम्ही कसत आहे. त्या जमिनीच्या सातबारा उताऱयावर दुसऱयाचे नाव दाखल करून ती जमीन विक्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत शेतकऱयांना जमीन सोडण्यासाठी धमकीही देण्यात आली आहे. तरी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केदनूर येथील शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
केदनूर येथील सर्व्हे नं. 51 व 52 मधील 5 एकर 29 गुंठे जमिनीच्या सातबारा उताऱयावर चौघांनी बेकायदेशीररीत्या नावे दाखल केली आहेत. त्यामध्ये एक वकील आणि स्टॅम्प रायटर्सचाही समावेश असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. 1960 पासून आम्ही ही जमीन कसत आहे. असे असताना अचानकपणे त्याची विक्री केल्याचे दाखविण्यात आले आहे. केदनूर येथील बाळकृष्ण सिद्धाप्पा राजाई व त्यांचे भाऊ 1960 पासून ही जमीन कसत आहेत.मात्र, आता त्यांच्यावर दमदाटी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कल्लाप्पा राजाई, सुरेश राजाई, जयवंत राजाई, नारायण राजाई, यादव राजाई, मारुती कल्लाप्पा राजाई, पुंडलिक नागो राजाई, महेश यल्लाप्पा राजाई यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.