वार्ताहर/ बुगटेआलूर
मत्तिवडे (ता. हुक्केरी) येथे हद्दीवरील गवत कापताना दोन भावांच्यामध्ये झालेल्या वादाचे रुपांतर भांडणात झाले. यात धारदार विळय़ाने घाव घातल्याने आप्पासाहेब कृष्णा उंदुरे (वय 71) यांचा खून त्यांचाच चुलत भाऊ विष्णू मल्लाप्पा उंदुरे याने केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता उंदुरे मळय़ामध्ये घडली आहे. संशयित आरोपी विष्णू उंदुरे (वय 68) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मत्तिवडे गावच्या हद्दीतील उंदुरे मळय़ामध्ये ही दोन्ही कुटुंबे राहत आहेत. त्यांची एकूण 15 एकर जमिनीची तीन हिस्स्यामध्ये वाटणी झाली असून वेगवेगळी शेती करणे चालू आहे. पण यांच्यामध्ये हद्दीवरुन वारंवार वाद घडत होते. शुक्रवारी मयत आप्पासाहेब उंदुरे हे आपल्या शेळीसाठी गवत आणण्यासाठी गेले असता विष्णू उंदुरे यांनी माझ्या हद्दीतील दगड बाजूला आले आहेत. गवत कापू नको असे सांगितले. या किरकोळ कारणावरुन केवळ एक फुटामध्ये आत-बाहेर पडलेल्या दगडावरुन वाद सुरू असताना विष्णू यांनी आप्पासाहेब यांच्या दोन्ही पायावर धारधार विळय़ाने जोराचा वार केल्याने पायाची नस तुटल्याने मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे आप्पासाहेब यांनी आरडाओरड केली. त्यावेळी आरडाओरड ऐकून मुलगा लक्ष्मण व भाऊराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. आप्पासाहेब यांना उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
मयत आप्पासाहेब यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात करण्यात आली असून आप्पासाहेब यांचा मृतदेह बेळगाव येथे उत्तरीय तपासणी करून शनिवारी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.