ज्याके-माणे, नेत्रावळी येथील प्रकार, शंभर वर्षे जुनी झोपडी गमावण्याची भीती, सावित्री कवळेकरकडून दखल, मदतीचे आश्वासन
प्रतिनिधी / सांगे
नेत्रावळी येथील ज्याके-माणे येथे शंभर वर्षांपासूनच्या वडिलोपार्जित झोपडीत राहणाऱया वृद्ध जोडप्याला जमीन खरेदी केलेले मालक हाकलून लावू पाहत आहेत. अशा परिस्थितीत जावे तरी कुणाकडे म्हणून अडचणीत सापडलेल्या गरीब वृद्धांना अखेर समाजसेविका सावित्री कवळेकर यांनी धीर दिला असून घरासाठी काही कायदेशीर लढाई करायची असल्यास आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे. सध्या राहत असलेल्या घरासाठी जी काही मदत लागेल ती आपण देण्यास तयार असून कोणत्याही परिस्थितीत आपण तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास सदर वृद्ध जोडप्याला त्यांनी दिला आहे.
ज्याके-माणे येथील वयोवृद्ध बिटयो वेळीप यांना तेथून हाकलून लावू पाहत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमातून व्हायरल झाल्यानंतर कवळेकर तेथे धावून गेल्या. बिटयो वेळीप यांचे आई-वडील याच ठिकाणच्या झोपडीत वास्तव्य करून राहत असत. रोजंदारीवर काम करून ते पोट भरत असत. आजही त्याच परिस्थितीत 70 वषीय बिटयो लक्ष्मण वेळीप आणि त्यांची पत्नी चंद्रावती वेळीप त्या झोपडीत राहत आहेत. ते सुद्धा रोजंदारीवर काम करून पोट भरत आहेत. पण आता अचानक ते राहत असलेल्या झोपडीसहित इतर जमीन अन्य ठिकाणच्या जमीनमालकाने खरेदी केली आहे.
वास्तविक जमीन खरेदी करताना विक्री करणाऱया आणि विकत घेणाऱया माणसांनी आणि खास करून एजंटनी अशा गरीब माणसांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते. त्यांच्यात समझोता घडवून आणणे गरजेचे होते. पण हल्ली नेत्रावळी गावातील जमिनीला सोन्याचा भाव आल्याने एजंट लोक जमिनीचा सौदा करताना जमिनीत कोणतीही अडचण नाही आणि असल्यास ती मोठी नाही, सहज बाजूला करता येईल अशा प्रकारचे आश्वासन देत असल्याने जमीन खरेदी केल्यानंतर असले प्रकार निर्माण होतात, असे दिसून येत आहे. केवळ पैशांसाठी माणुसकी विकू नये अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया गावातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
आज शंभर वर्षांची झोपडी हटविण्यासाठी नवीन जमीनमालक तगादा लावत असल्याने बिटयो वेळीप आणि त्यांची पत्नी विवंचनेत पडली आहे. या झोपडीत बिटयो व त्यांची पत्नी हे दोघेच राहतात. त्या घराला दरवाजा नाही, वीज नाही, पाणी नाही. अशा कठीण परिस्थितीत वृद्ध जोडपे दिवस काढत आहे. एकमेव मुलगा बाळ्ळी येथे मासिक दहा हजार रुपये वेतनावर खासगी काम करत आहे. अशा गरीब परिस्थितीत जगणाऱया कुटुंबावर अन्य ठिकाणी जाण्याचा प्रसंग जमीनमालकाने आणला असल्याची माहिती मिळताच भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा असलेल्या कवळेकर यांनी ज्याके-माणे येथे जाऊन त्या कुटुंबाला धीर दिला. आता असलेल्या घराची दुरुस्तीही करून देण्यात येणार असून तुम्ही कोणत्याही परिस्थितीत धीर सोडू नका. आपले संपूर्ण सहकार्य तुम्हाला आहे, असे बिटयो वेळीप यांना त्यांनी सांगितले.
कुटुंबावर अन्याय : गावकर
यावेळी नेत्रावळीचे माजी सरपंच शशिकांत गावकर म्हणाले की, बिटयो वेळीप यांचे वडील शंभर वर्षांपूर्वीपासून याच घरात राहत आले. आज ते कायदेशीरपणे त्या जमिनीचे कुळ झाले आहेत. असे असताना अचानक त्यांना त्या घरातून हुसकावून लावणे हा अन्याय आहे. एक चौदाच्या उताऱयावर त्या कुटुंबाचे नाव लागलेले आहे. आम्ही हा प्रकार खपवून घेणार नसून बिटयो वेळीप यांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी आयोगाकडे दाद मागण्यास मदत करणार : केपेकर
रिवण जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांनीही बिटयो वेळीप यांची भेट घेऊन धीर दिला. जमीन विकणारा आणि जमीन घेणारा यांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे. आपण त्यांना एसटी आयोगाकडे दाद मागण्यासाठी तक्रार करण्यास मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे घरपट्टी भरत असल्याची पावती असल्यास अटल आसरा योजनेंतर्गत घरासाठी त्यांना मदत मिळवून देणार आहे. ऍट्रॉसिटी कायद्याखालीही तक्रार करता येते. वयोवृद्ध आदिवासी कुटुंबावर हा अन्याय आहे, असे केपेकर म्हणाले. यावेळी त्यांनी एकूण परिस्थितीची पाहणी केली व त्यांना सहानुभूती दर्शविली. हलाखीत जीवन जगणारे हे कुटुंब सरकारी योजनांपासून वंचित आहे. घरात दोघेही वयोवृद्ध असताना दयानंद सामाजिक योजनेचा लाभही त्यांना मिळत नाही असे सांगण्यात आले आहे.