तेलंगणात ई राजेंद्र यांच्याविरोधात चौकशीचे आदेश
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणातील एका मंत्र्यावर जमीन बळकाविण्याचा आरोप झाल्याने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्याकडून मंत्रिपद काढून घेतले आहे. शेतकऱयांनी राज्याचे आरोग्यमंत्री ई. राजेंद्र यांच्यावर जमीन बळकाविल्याचा आरोप केला होता. शेतकऱयांनी याप्रकरणी मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडे तक्रारही केली होती. याची दखल घेत केसीआर यांनी कारवाई करत आरोग्यमंत्री ई. राजेंद्र यांच्याकडून विभाग काढून घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी दक्षता विभागाला या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले आहे.
याचबरोबर मुख्यमंत्री केसीआर यांनी पोलीस महासंचालक पूर्णचंद्र राव यांना याप्रकरणी लवकरच प्रारंभिक अहवाल सोपविण्यास सांगितले आहे. त्यानंतर एक विस्तृत अहवालही तयार करण्यास सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मेडक जिल्हय़ातील मसईपेटा विभागातील अचमपेट आणि हाकिमपेटा गावातील 8 शेतकऱयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंत्री ई. राजेंद्र आणि त्यांच्या समर्थकांनी अवैध मार्गाने जमीन हडपून धमकाविल्याचे नमूद पेले होते.
या पत्राची प्रत मंत्री हरीश राव, खासदार प्रभाकर रेड्डी, नरसापूर आमदार मदन रेड्डी, प्रमुख सचिव सोमेश कुमार आणि मेडक जिल्हाधिकारी हरीश यांनाही पाठविण्यात आली होती. 1994 मध्ये सर्वेक्षणानंतर सरकारकडून शेतकऱयांना ही जमीन वितरित झाली होती असे पत्रात म्हटले गेले आहे.
काही महिन्यांपूर्वी ई. राजेंद्र यांचे दोन समर्थक सुरी उर्फ अली सुदर्शन आणि अंजला सुधाकर रेड्डी यांनी बेकायदेशीरपणे आमच्या जमिनीवर कब्जा करत सरकार ही जमीन परत घेत असल्याचे सांगितले. त्यांनी गरीबांची 100 एकर जमीन हडप केली आहे. यातील बहुतांश भूमीवर पोल्ट्री उद्योग कुठल्याही अनुमतीशिवाय उभारला जात असल्याची तक्रार शेतकऱयांनी पत्राद्वारे केली आहे.
तर ई. राजेंद्र यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. कटाच्या अंतर्गत अडकविले जात आहे. माझ्यावरील सर्व आरोप राजकीय कटाचा भाग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.