रणबीर कालव्यातील जलपर्णी हटविली
वृत्तसंस्था / जम्मू
रणबीर कालवा जम्मू क्षेत्रातील शेतकऱयांसाठी सिंचनाचा महत्त्वाचा स्रोत आहे. 1905 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या या कालव्याला जम्मूची जीवनरेषा म्हटले जाते. 59.55 किलोमीटर लांबीचा हा कालवा या क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरला असून तेथील कृषी अर्थव्यवस्थेचे चित्रच पालटले आहे. आरएस पुरामध्ये पिकविल्या जाणाऱया प्रसिद्ध बासमती तांदळाची शेती याच कालव्यातील पाण्यावर अवलंबून आहे. या कालव्यातील जलपर्णी हटविण्याचे काम पूर्ण करत बीएसएफने शेतकऱयांची मोठी समस्या दूर केली आहे.
हा कालवा आंतरराष्ट्रीय सीमेनजीकच्या क्षेत्रातून जातो. मागील अनेक वर्षांपासून यात मोठय़ा प्रमाणात जलपर्णीचा वेढा पडल्याने कालव्याच्या प्रवाहात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. या जलपर्णींमुळे पाण्याचा पूर्ण वापर शेतीसाठी करणे अशक्य ठरले होते. शेतकऱयांनी केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाशी जलपर्णी हटविण्यासाठी संपर्क केला होता. जम्मू-काश्मीरच्या सिंचन-पूर नियंत्रण विभागाने यासंबंधी बीएसएफच्या अधिकाऱयांशी चर्चा केली होती. आंतरराष्ट्रीय सीमेनजीक असलेल्या या कालव्यातील जलपर्णी हटविण्याचे काम पाकिस्तानकडून या भागात सातत्याने गोळीबार केला जात असल्याने अवघड होते. परंतु बीएसएफने शेतकऱयांचे हित लक्षात घेत जम्मू-काश्मीर प्रशासनाला मदत केली आहे. बीएसएफने अरनिया आणि आरएस पुरा सेक्टरमध्ये कालव्यातील जलपर्णी हटविण्याचे काम पेले आहे.
पाकिस्तानचा आक्षेप
सीमेनजीक हे काम बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या देखरेखीत आणि प्रशासकीय कर्मचाऱयांच्या पूर्ण सुरक्षेत करण्यात आले आहे. बीएसएफने विक्रमी वेळेत हे काम पूर्ण केले आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी कालव्यातून जलपर्णी हटविण्याच्या कामावर आक्षेप घेतला होता. परंतु बीएसफने नियोजनबद्धरित्या हे काम पार पाडले आहे. स्थानिक लोक या कामामुळे आनंदी असून शेतकऱयांना याचा मोठा लाभ होणार आहे.