भारतामधील संख्या 34 वर, 31 मार्चपर्यंत शाळा बंदचा निर्णय : तामिळनाडूमध्येही 3 संशयित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू आणि काश्मीरमध्ये कोरोना संसर्गित दोन रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. दोन संशयितांच्या रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह आले असून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. दोघांची प्रकृती स्थिर असली तरी जम्मू काश्मीर प्रशासनाने अतिदक्षता आदेश जारी केले आहेत.
मुख्य सचिव रोहित कंसन यांनी तातडीने आदेश जारी करत 31 मार्चपर्यंत सर्व प्राथमिक शाळा तसेच बायोमेट्रिक हजेरी रद्द केली आहे. कंसल यांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू आणि सांबा जिल्हय़ात याची तातडीने अंमलबजावणी केली जात आहे. तर तामिळनाडूमध्येही तीन रुग्ण आढळले आहेत. ते ओमान येथून आले आहेत. यामुळे देशातील संसर्गितांची संख्या 34 झाली आहे. यामध्ये 18 भारतीय आणि 16 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
इटलीमध्ये 24 तासात 49 बळी
दरम्यान, इटलीमध्ये कोरोना व्हायरसची दहशत पसरली असून गेल्या 24 तासांमध्ये 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीनबाहेर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बळी जाण्याची ही पहिलीच वेळ असून इटलीमध्ये चिंताजनक व आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. दक्षिण कोरिया आणि इराणमधील परिस्थितीही गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
आरोग्य संघटनेकडून इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसचा फैलाव गंभीर बाब असून सर्व देशांनी याची काळजी घ्यायला हवी. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी हे मॉकड्रिल नाही, श्रीमंत असो की गरीब प्रत्येक देशाला या साथीचा धोका आहे, असा इशारा दिला आहे.
दिल्लीत तिसरा रुग्ण
जम्मूमधील परिस्थिती गंभीरतेकडे झुकत असताना दिल्लीत तिसरा संशयित समोर आला आहे. थायलँड आणि मलेशिया दौऱयानंतर त्याला लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे देशातील रुग्णांची संख्या 32 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती स्थिर आहे. तर मयुरविहार येथील 45 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे, असे सांगितले.
30 विमानतळांवर स्क्रीनिंग सुविधा
देशभरातील 30 विमानतळांवर स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी उतरणाऱया प्रत्येक परदेशी नागरिकाची कसून तपासणी केली जात आहे. याआधी 21 विमानतळांवर ही सुविधा होती. सरकारने सर्व परदेशी नागरिकांची तपासणी अनिवार्य केली आहे, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले. इराणहून आलेल्या 13 पर्यटकांना अमृतसर येथे स्वतंत्र हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचीही आरोग्य तपासणी केली आहे.
डब्ल्यूएचओतर्फे 280 जणांना प्रशिक्षण
जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने एक दिवशीय प्रशिक्षण आयोजित केले असून सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश, रेल्वे, सेनादल आणि निमलष्करी दलातील निवडक 280 जणांना खास प्रशिक्षण देण्यात येत आहे. सध्या 29 हजार 607 संशयितांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. गेल्या महिन्यात चीनमधील वुहानमधून आणलेल्या भारतीयांची दोनवेळा सखोल आरोग्य पडताळणी करण्यात आली अहे. दोन्हीवेळा त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना सोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
देशभरात तपासणी, नमुना नोंदणी केंद्र स्थापन
कोरोनाचा धोका टाळण्याकरता केंद्र व राज्य सरकारने युद्धपातळीवर तयारी केली आहे. देशभरात याकरता 52 तपासणी केंद्र तसेच 57 ठिकाणी नमुना कलेक्शन सेंटर स्थापन केले आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) अंतर्गत त्यांचे नियंत्रण केले जाणार आहे. एम्स आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांचीही मदत घेतली जाणार आहे, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.