ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा हिरावून घेतलेला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करावा, अशी मागणी काश्मीरचे ज्येष्ठ नेते व ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे.
दहा महिन्यांच्या स्थानबद्धतेतून सुटका झाल्यानंतर फारूक अब्दुल्ला यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अब्दुल्ला म्हणाले, केंद्र सरकारने मागील वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवले. जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. त्याला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे.
केंद्र सरकारला काश्मिरी जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी हिरावून घेतलेला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करावा लागेल. काश्मीरची भरभराट होण्यासाठी आणि दहशतवाद रोखण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगितले. मात्र, काश्मिरी लोकांना विचाराल तर ते सांगतील की, पूर्वीपेक्षा दहशतवाद वाढला आहे. राज्याचा दर्जा गमावल्याने काश्मीरने बरंच काही गमावलं आहे, असेही अब्दुल्ला म्हणाले.