ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी जवानांना मोठी सफलता मिळाली आहे. श्रीनगरमधील दानमर भागातील अलमदार कॉलनी येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कर ए तोयबा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर व श्रीनगर भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सतत चकमकी सुरू आहेत. कालच दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक पाकिस्तानी कमांडर व त्याचे दोन साथीदार ठार झाले आहेत.
पुलवामा शहरात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मंगळवारी रात्री त्या भागाला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येऊन दहशतवाद्यांचा नेमका ठावठिकाणा शोधण्यात आला आणि त्यांना शरण येण्याची संधी देण्यात आली. मात्र त्यांनी शोधपथकावर अंदाधुंद गोळीबार केला. सुरक्षा दलांनी याला प्रत्युत्तर दिल्यानंतर चकमक झडली, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
- या वर्षात आतापर्यंत 78 दहशतवाद्यांना कंठस्नान
पुढे ते म्हणाले, सध्या या भागात शोध अभियान सुरू आहे. या महिन्यातील हा श्रीनगरमधील दुसरा एन्काऊंटर आहे. पुढे ते म्हणाले, या काश्मीर घाटात आतापर्यंत 78 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यामधील 39 दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाचे होते. तर अन्य दहशतवादी हे हिजबुल मुजाहिदीन, अल – बदर, जैश ए मोहम्मद आणि अन्सार – गजवातुल – हिंद यांच्याशी जोडलेले आहेत.