प्रतिनिधी / कोल्हापूर
भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीतर्फे (इंडियन नॅशनल ऍकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग) दिला जाणारा यंदाचा प्रोफेसर जयकृष्ण स्मृती पुरस्कार कोल्हापूरचे सुपुत्र आणि मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रोफेसर डॉ. जी. डी. यादव यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रूपये, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 16 डिसेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
प्रोफेसर जयकृष्ण स्मृती पुरस्कार हा देशातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीकडून विज्ञान, अभियांत्रिकी शाखेत संशोधन करणाऱया, अमूल्य योगदान देणाऱया प्रोफेसरला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. संपूर्ण देशात दरवर्षी एकाचीच निवड केली जाते. यंदाच्या वर्षी हा सन्मान प्रोफेसर डॉ. जी. डी. यादव यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूर जिल्हÎातील अर्जूनवाड (ता. राधानगरी) गावाचे सुपुत्र असणाऱया डॉ. यादव यांनी केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात देश आणि विदेशात संशोधक म्हणून ख्याती संपादन केली आहे. मुंबईत इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्थेची स्थापना करण्याचे श्रेय डॉ. यादव यांना जाते. तेच या संस्थेचे पहिले संस्थापक कुलगुरूही होते.
विद्यापीठाचा दर्जा असणाऱया या संस्थेच्या माध्यमातून डॉ. यादव यांनी हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना संशोधन आणि प्रकल्प कार्यातही मार्गदर्शन केले. संशोधक असणाऱया डॉ. यादव यांच्या नावावर तब्बल 113 पेटंट आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 104 विद्यार्थ्यांनी पीएचडी केली आहे. आपल्या संपूर्ण देशात डॉ. यादव यांचा हा विक्रम आहे. त्याचबरोबर डॉ. यादव यांनी 491 रिसर्च पेपरही (शोध निबंध) सादर केले आहेत. सध्या ते हायड्रोजन आणि कार्बनडायऑक्साईड संदर्भात स्वतंत्र असे संशोधन करत आहेत. त्याचबरोबर अनेक प्रकल्पातही मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या सल्लागार समितीवरही डॉ. यादव अमूल्य योगदान देत आहेत. दरम्यान, डॉ. यादव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कोल्हापुरातील विद्यार्थी व हितचिंतकांही आनंद व्यक्त केला आहे.
पहिले आणि एकमेव
इन्स्टिटÎट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचा प्रोफेसर जयकृष्ण स्मृती पुरस्कार मिळविणारे डॉ. जी. डी. यादव हे पहिले महाराष्ट्रीयन संशोधक ठरले आहेत. त्याचबरोबर केमिकल इंजिनिअरिंगमध्ये देखील हा पुरस्कार मिळविणारे ते देशातील पहिले संशोधक ठरले आहेत. डॉ. यादव यांना मिळालेला सन्मान कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा ठरला आहे.