प्रतिनिधी/ रत्नागिरी
मच्छीमारांना या हंगामात मच्छीची बंपर लॉटरी लागत असल्याचे दिसून येत आहे. जयगड येथील दोन नौकांना सरंग्याची लॉटरीच लागली आहे. दोन नौकांना प्रत्येकी अडीच टन असा 5 टन सरंगा सापडला आहे. 400 रुपये किलोने हा सरंगा विकला गेला असून सरंगा विक्रीतून 10 लाखापेक्षा अधिकची उलाढाल झाली आहे.
येथील मच्छिमार नौका बुधवारी मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी या नौकांनी जयगड बंदरानजिक डोल सोडली. त्यावेळी जाळ्यात बंपर सरंगा सापडला. सापडलेल्या सरंग्याचा व्हिडीओही मच्छीमारांनी केला आहे. गुरुवारी सायंकाळनंतर बंपर सरंग्याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
काही दिवसांपूर्वी मिरकरवाडा येथील मासेमारी नौकेच्या जाळ्यात मोठय़ा प्रमाणावर घोळ मासा सापडला होता. मात्र ही घोळ जाळ फाडून निघून गेली होती. गुरुवारी जयगड येथील दोन नौकांच्या जाळ्यात मोठय़ा प्रमाणावर सरंगा मिळाला. एकाचवेळी दोन बोटींना 5 टन रिपोर्ट लागल्याची बातमी जयगड परिसरात अवघ्या काही वेळात पसरली. गुरुवारी सायंकाळी बंपर सरंगा घेऊन दोन्ही नौका जयगड बंदरावर दाखल झाल्या. याच ठिकाणी दोन्ही बोटींवरील मासळीचा लिलाव झाला. 400 रुपये किलोचा भाव या सरंग्याला मिळाला. पाच टनाचा भाव दहा लाखांपेक्षा अधिकच्या घरात गेल्याची चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून बदलत्या वातावरणाचा मासेमारीला फटका बसत आहे. आधी क्यार वादळ आणि नंतर समुद्रात अचानक कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने मासेमारी अनेक दिवस ठप्प होती. अशातच परतीच्या पावसाने वातावरण अचानक खराब होत असल्याने कधीही नौका माघारी परतत आहेत. अशा परिस्थितीत अचानक लागलेला बंपर रिपोर्ट मच्छीमारांसाठी दिलासादायक ठरत आहे.