जयपूर
प्राप्तिकर विभागाने ज्वेलरी आणि रत्नांच्या निर्यातीशी संबंधित जयपूरमधील एका समुहावर छापे टाकले आहेत. या छाप्यांदरम्यान 500 कोटी रुपयांहून अधिक अवैध उत्पन्नाचा थांगपत्ता लागला आहे. 23 नोव्हेंबर रोजी टाकण्यात आलेल्या छाप्यांदरम्यान प्राप्तिकर विभागाने सुमारे 50 ठिकाणी शोध घेतला होता. समुहाच्या विरोधातील कारवाईत 4 कोटी रुपये आणि 9 कोटी रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आल्याचे सीबीडीटीने बुधवारी सांगितले. तर 500 कोटी रुपयांच्या काळय़ा पैशापैकी 72 कोटी रुपयांच्या अवैध उत्पन्नाची कबुली समुहाने दिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) प्राप्तिकर विभागासाठी धोरण निश्चित करते.