दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या शोकसभेत मंत्री मुश्रीफ यांचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहराच्या विकासकामांसाठी झटणारे काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना आगामी पोटनिवडणुकीत उमेदवारी द्यावी. भाजपने मोठे मन करून ही निवड बिनविरोध करावी. महाविकास आघाडीसह सर्वपक्षीय घटकांनी बिनविरोध निवड करून चंद्रकांत जाधव यांना खरी श्रद्धांजली अर्पण करुया असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले
.
`कोल्हापूर उत्तर’ दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, पोटनिवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची हा कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. पण जाधव यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यातून त्यांना खऱया अर्थाने सावरायचे झाल्यास आमदार जाधव यांच्या स्वप्नातील कोल्हापूरचा विकास करायचा झाल्यास त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देणे अपेक्षित आहे. भाजपने विधानपरिषदेतील काही जागा बिनविरोध केल्या आहेत. त्यामुळे आताही मनाचा मोठेपणा दाखवावा. दिवंगत आमदार जाधव यांनी गेल्या दोन वर्षात मिळवलेले प्रेम आणि त्यांनी केलेल काम सर्वांच्या आठवणीत राहील.
सर्व गोष्टींची जाण असणारा नेता आपल्यातून निघून गेला हे दुर्दैवी असून त्यांना अपेक्षित असलेले उद्योग केंद्र उभारण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूया. कमी कालावधीमध्ये सर्व विषयांचा अभ्यास असणारा माणूस आपल्यात नाही. त्यांच्या अंत्ययात्रेला झालेल्या गर्दीवरून त्यांचे मोठेपण व त्यांचे आणि कामगारांचे जवळचे नाते दिसून आले. आमदार जाधव यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. यातून त्यांना सावरण्याचा प्रयत्न करूया, अशा भावना पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या.
कोल्हापूरच्या उद्योजकांचे प्रश्न वारंवार मांडणारा, राजकारणापेक्षा कोल्हापूरचा विकास या भावनेने काम करणारा आमदार निघून गेल्याची भावना खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली. यावेळी जाधव यांचा दोन वर्षाचा राजकीय प्रवास उत्कृष्ट आणि सर्वांच्या आठवणीतला राहिल. त्यांची उद्योगासंदर्भातील तळमळ जवळून पाहिल्याची भावना आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली. राजकारण सोडून ते नेहमी काम करायचे, कोल्हापुरची कामे ते पोट तिडकीने मांडायचे असे मत आमदार पी एन पाटील यांनी व्यक्त केले. आमदार राजू बाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर यांनीही अण्णांच्या आठवणीना उजाळा दिला.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पवार, शेकापचे बाबुराव कदम, माकपचे चंद्रकांत यादव, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, बाबा पार्टे, कादर मलबारी, अशोक भंडारी, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे माणिक मंडलिक, आनंद माने, वसंतराव मुळीक, महेश जाधव, राहुल चिकोडे, बाबासाहेब देवकर, जयवंत हरूगले यांनी भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, सर्व पक्षातील नेते, अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अतिदक्षता विभागातूनही जनतेसाठी धडपडणारे `आण्णा'
आठ दिवसापूर्वी भेटलेले आण्णा, आठ दिवसानंतर भेटणार नाहीत असे कोणालाही वाटले नव्हते. एक जिद्दी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख सर्वांनी पाहिलेली आहे. त्यांचे व्हिजन मोठे होते. प्रत्येक गोष्टीत बरकावा होता. जिह्याचा आणि शहराचा विकास करण्याची तळमळ असल्यामुळे ते प्रत्येक क्षेत्रात पोहचले होते. अतिदक्षता विभागात असतानाही त्यांनी समजकारणासाठी आणि लोकांसाठी काम थांबवले नाही. लोकांचे वीज कनेक्शन तोडल्याचे समजताच अण्णांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत याना रुगणालयातूनच फोन केला. लोकांसाठी तळमळ, जिद्द आणि लढाऊ माणूस आपल्यातून गेल्याची खंत पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.