जयसिंगपूर / प्रतिनिधी
येथील पालिकेला सप्टेंबर 2019 मध्ये तत्कालीन आमदार उल्हास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून प्राप्त झालेली शववाहिका गेली कुठं , याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे . याबाबत माहिती देताना विद्यमान नगरसेवक पराग पाटील म्हणाले केवळ राजकीय हेतूनेच सदरच्या शववाहिकेबाबत गैरसमज पसरवण्यात आले आहेत . जाणीवपूर्वक तांत्रिक मुद्दे उपस्थित करून सदरची शववाहिका ताब्यात घेण्यास पालिका प्रशासनाने असहमती दर्शवली आहे .
आमदार उल्हास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून प्राप्त झालेल्या शववाहि के च्या सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली असून नगरपरिषदेने सदरची शववाहिका ताब्यात घ्यावी , असे आवाहन पराग पाटील यांनी केले आहे . पालिकेची आर्थिक परिस्थिती शववाहिका सांभाळण्या इतकी सक्षम नसेल तर पालिकेने सामाजिक संस्था यांच्याकडे ती देखभाल दुरुस्ती करण्याच्या अटीवर देण्यास काहीच हरकत नाही ,जेणेकरून शासनाकडून प्राप्त झालेली शववाहिका नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल ;याबाबत पराग पाटील यांनी जिल्हा आस्थापना विभागाकडे आपली व्यथा मांडली आहे . त्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याविरोधात तक्रार केली असून त्याबाबतची कागदपत्रे प्रशासनाकडे सादर केली आहेत.
दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या सभेमध्ये चुकीच्या पद्धतीने ठराव करून राजकीय द्वेषातून सदरची शववाहिका नाकारण्याचा प्रकार घडला असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून पालिकेकडे नुकतीचशववाहिका प्रदान करण्यात आली आहे . याबाबत पालिकेची 10 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या ऑनलाइन मीटिंगमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून प्राप्त झालेल्या शववाहिका देखभाल दुरुस्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. मात्र ठराव करीत असताना कोणत्याही चर्चेविना बेकायदेशीरपणे पूर्वीची शववाहिका खरेदी प्रक्रिया बंद करण्यात यावी , असा ठराव झाल्याने विद्यमान नगरसेवक पराग पाटील यांनी जिल्हा अस्थापना विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. सत्ताधाऱ्यांनी आजवर शहरांमध्ये मनमानी कारभार केला, असून केवळ विकासाच्या गप्पा मारत कोणतेच ठोस कार्य केला नसल्याचा आरोप केला. गेल्या वीस वर्षात पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचे त्यांनी सांगितले . आमदार उल्हास पाटील यांच्या स्थानििक स्वराज्य निधीतून प्राप्त होत असलेली शववाहिका ही शासनाकडून प्राप्त होत आहे . त्याची देखभाल करण्यास पालिका प्रशासन असमर्थता दर्शवते याचा अर्थ काय? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी सत्ताधारी गट नेत्यावर टीका केली.