परिवर्तन संघटनेला यश -संजय पाटील
कोल्हापूर / प्रतिनिधी
रेशन धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी जयसिंगपूर (ता.शिरोळ) येथील तीन रेशन दुकानांचे परवाने रद्द करून अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केली. त्यामुळे परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे.
जयसिंगपूर विकास सोसायटीअंतर्गत रेशन दुकान क्रमांक 2/3/5 येथून बोलेरो टेम्पोतून रेशन धान्याची पोती बाहेर विकण्यासाठी जात असताना त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले होते. तसेच ज्या मिलमध्ये धान्य उतरले त्यातील रजिस्टर प्रत व पुरावे तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी तातडीने जागेवर जाऊन सदर दुकानांची तपासणी केली होती. यावेळी तेथील धान्याचा मेळ घातला असता गहू 29.79 क्विंटल व तांदुळ 41.11 विंटल इतका ठरवून दिलेल्या परमिट प्रमाणापेक्षा अधिक आढळला होता. त्यानंतर परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सतीश मोटे, श्रीकांत शिंगाई यांनी तक्रार दिली होती. या अनुषंगाने तहसीलदारांनी टेम्पोचालक व सेल्समन जितेंद्र गुप्ता यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान तहसीलदारांच्या अहवालानुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सदर दुकानांचा परवाना का रद्द करू नये अशी नोटीस काढली होती. त्याची सुनावणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसमोर झाली. यावेळी ज्यादा धान्याची पोती कोठून आली याबाबत तीन दुकानांचा सेल्समन जितेंद्र गुप्ता यांना व संस्था चालकांना कोणतेही अभिलेख सादर करता आले नाहीत. त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली होती. पण समाधानकारक खुलासा करण्यात दुकान चालकांना अपयश आले. दुकानात जे धान्य शिल्लक होते, त्याच्या लाभार्थ्यांची यादी संस्थेने सादर केली होती. ती यादी पुरवठा विभागाने ऑनलाईन पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य आढळून आले नाही. तसेच त्या धान्य साठ्य़ाबाबत कोणतेही संयुक्तिक कारण त्यांना देता आले नाही.
जयसिंगपूर गावात ही तिन्ही दुकाने प्राधिकार पत्रानुसार वेगवेगळ्या ठिकाणी आवश्यक असताना बेकायदेशीरपणे एकाच इमारतीत आढळून आले असून तीन दुकानांमध्ये गुप्ता नावाचा एकच सेल्समन नेमण्याची गंभीर बाब सुद्धा समोर आली आहे. या सर्व बाबी गंभीर असल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी कवितके यांनी दुकानांची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करून परवाने रद्द करण्याचे आदेश लागू केले. परिवर्तनचे संजय पाटील यांनी प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधून पाठपुरावा करून व आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच सदरची मोठी कारवाई झाली आहे.