पराक्रम दिनी राजकीय नाटय़ ; मोदींच्या कार्यक्रमातील प्रकार
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी राजकीय गदारोळ झाला आहे. कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज झाल्या आहेत. कार्यक्रमात ममता बॅनर्जी भाषण करण्यासाठी सरसावल्या असता उपस्थित समुदायातून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. या प्रकारामुळे ममतादीदी भडकल्या आणि भाषण न करताच तेथून परतल्या.
हा काही राजकीय कार्यक्रम नव्हे. सरकारच्या कार्यक्रमात प्रतिष्ठा असावी. हा जनतेचा कार्यक्रम आहे. कोलकात्यात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पंतप्रधान आणि सांस्कृतिक मंत्रालयाची आभारी आहे. पण, कुणाला निमंत्रित करून अशाप्रकारे अपमानित करणे शोभा देत नाही. याचा विरोध करत आता मी काहीच बोलणार नसल्याचे ममतांनी म्हटले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नाटय़
व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये नेताजींच्या सन्मानार्थ पोस्ट तिकीट आणि नाण्याचे अनावरण करण्यात आले. तसेच आझाद हिंद सेनेच्या सदस्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. कार्यक्रमातील काही भाग आटोपल्यावर ममता बॅनर्जी यांना भाषणासाठी आमंत्रित करण्यात आल्यावर उपस्थित जनसमुदायातून जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रकारावर ममतांनी अत्यंत कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करत केवळ 35 सेकंदांमध्ये स्वतःचे म्हणणे संपविले आहे. ममतांसह तृणमूलच्या नेत्यांनी यापूर्वीही जय श्रीराम या नाऱयाला विरोध दर्शविला आहे. जय श्रीरामची नारेबाजी पश्चिम बंगालमध्ये चालणार नसल्याचेही तृणमूलकडून म्हटले गेले होते.
एकत्र पण बोलणं टाळलं
नेताजी बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी कोलकात्याचा दौरा करत तेथील राष्ट्रीय वाचनालयाला भेट दिली. त्यानंतर मोदींनी व्हिक्टोरिया मेमोरियल येथील कार्यक्रमास हजेरी लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही त्यांच्यासोबत होत्या, परंतु एकत्र बसूनही दोघांमध्येही औपचारिक बोलणंही झालं नाही.
नेताजींना गर्व झाला असता
आजचा दिवस केवळ नेताजींचा जन्मदिन नाही, तर भारताच्या आत्मसन्मानाचाही जन्म झाला होता. नेताजी हयात असते तर आज त्यांनी कोरोनाविरोधी युद्धात भारत यशस्वी ठरत असल्याचे पाहिले असते. भारत स्वतः लस तयार करतोय, अन्य देशांना लस पाठवून मदत करतोय, हे चित्र पाहून निश्चितपणे त्यांना गर्व वाटला असता, असे मोदींनी म्हटले आहे.
ममतांचे शक्तिप्रदर्शन
मोदींच्या आगमनापूर्वीच राज्याच्या मुख्यमंत्री ममतांनी कोलकात्याच्या श्यामबाजारापासून रेड रोडपर्यंत सुमारे 8 किलोमीटरची पदयात्रा काढली. या पदयात्रेद्वारे त्यांनी एकप्रकारे शक्तिप्रदर्शनच केले आहे. राज्यात यंदा विधानसभा निवडणूक होणार असून यात तृणमूल काँग्रेसकरता भाजपच मुख्य आव्हान ठरला आहे. भाजपचे वाढते बळ तसेच पक्षातील बंडखोरींमुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोर 10 वर्षांमध्ये पहिल्यांदाच तीव्र आव्हान उभे ठाकले आहे.
कोलकात्याला राजधानीचा दर्जा द्या
ममतांनी कोलकाता शहराला राजधानीचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. इंग्रज कोलकात्यामधूनच देशावर राज्य करत होते. या पार्श्वभूमीवर आमच्या देशात एकाच शहराला राजधानीचा दर्जा का? देशात चार राजधान्या असाव्यात अशी मागणी करत ममतांनी राजकीय खेळी केली आहे.
बंगाली अस्मिता कार्ड
ममतांनी कोलकात्याला राजधानीचा दर्जा देण्याची मागणी का केली हे समजणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी कोलकात्यात असताना त्यांनी ही मागणी केली असल्याने याला राजकीय संदर्भ निश्चितच आहे. भाजपला बंगालच्या महापुरुषांविषयी जाणीव नसल्याचा आरोप ममतांनी अनेकदा केला आहे. अशाप्रकारे ते बंगाली अस्मितेला फुंकर घालू पाहत आहेत. आता 4 राजधान्यांची त्यांनी केलेली मागणी ही त्याच बंगाली अस्मितेच्या कार्डचा विस्तार आहे.
पराक्रम दिनही फेटाळला
आम्ही नेताजींचा जन्मदिन केवळ निवडणुकीच्या वर्षात साजरे करत नाही. नेताजींना त्यांच्या हक्काचा सन्मान मिळालेला नाही. राज्य सरकार त्यांची 125 वी जयंती मोठय़ा प्रमाणावर साजरी करत आहे. रविंद्रनाथ टागोरांनी नेताजींना देशनायक संबोधिले होते. याचमुळे आम्ही याला देशनायक दिन नाव दिल्याचे उद्गार ममतांनी काढले आहेत.
बंगाली अस्मितेचे राजकारण
बंगालमध्ये राज्याचा इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित महापुरुषांचा विशेष सन्मान राहिला आहे. तेथील जनता याला बंगाली अस्मितेशी जोडून पाहते. तेथे क्रीडा आणि कलेचे शिक्षण प्रत्येक घरात दिले जाते, याचमुळे जनता सांस्कृतिक कार्यक्रमांशी थेटपणे जोडलेली असते. याचमुळे नेताजींच्या जयंतीनिमित्त भाजप तसेच तृणमूलने या बंगाली अस्मितेला आपलेसे करण्याचा प्रयत्न चालविला आहे.