पुणे \ ऑनलाईन टीम
साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने ईडीने अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री करण्यात आल्याचं म्हटलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, साखर कारखान्यांना एक वर्षाची मुदत द्या अशी सूचना करण्यात आली होती. एका वर्षात जर त्यांनी रक्कम न भरता पैसे थकवले तर ते विक्रीला काढा अशी सूचना मुंबई हायकोर्टाने दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, कायदेशीर प्रक्रिया राबवून टेंडर काढून विक्री करण्यात आली. त्या १४ साखर कारखान्यांमध्ये जरंडेश्वर साखर कारखानादेखील होता. हा कारखाना विकत घेण्यासाठी १२ ते १५ कंपन्यांनी टेंडर भरलं होतं. पण यामधील सर्वात जास्त टेंडर ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने भरलं होतं. त्यांनी ६५ कोटी ७५ लाखांची बोली लावली आणि तो विकला गेला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांनी इतर साखर कारखाने विकत घेतले, असल्याचे असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
अजित पवार यांनी या कारखान्याच्या खरेदी-विक्रीसह कारखान्याच्या नफ्या-तोट्याचीही माहिती दिली. आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, सुंदरबाग सोसायटीने याबाबत याचिका दाखल केली होती. त्यात 14 कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना होता. 2016 आणि 2017 मध्ये सर्व रितसर परवानग्या घेतल्या होत्या. माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जातील, असं अजित पवार म्हणाले.