कोरेगाव : १५ वर्षे पवार कुटुंबातील लोक मुख्यमंत्री व केंद्रात मंत्री होते. त्यावेळेस पध्दतशीरपणे साखर कारखाने आजारी पाडण्यात आले. त्यानंतर त्यांनी व त्यांच्या कंपूने कारखाने बळकावले, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. तसेच जरंडेश्वर कारखान्याचा नेमका मालक कोण? असा थेट सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला. हिंमत असेल तर माझ्यावर हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा, असे ओपन चॅलेंज देखील त्यांनी दिले.
किरीट सोमय्या यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव कांबळे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह बुधवारी सकाळी चिमणगाव येथील जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार टीका केली. सोमय्या म्हणाले, जरंडेश्वर कारखान्याचे संचालक आणि कारखान्याच्या मूळ संस्थापकांच्या व्यथा ऐकण्यासाठी येथे आलो आहे. जरंडेश्वर कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत बोलण्यास मी आलो नाही. या कारखान्याचा मालक कोण, अजित पवार यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवावे, या कारखान्याचे मालक कोण, चालवतोय कोण, बेनामी पध्दतीने ताब्यात कसा घेतला, याची कथा अजित पवारांनी सांगावी, म्हणजे त्याच्यावर एक पिक्चर बनवता येईल, असे सोमय्या म्हणताच एकच हशा पिकला.
तुमच्या काळात ज्या पध्दतीने कारखाने ताब्यात घेण्यात आले, अशा पाच कारखान्यांचा मी अभ्यास करत आहे, एक कंपनी, दुसरी कंपनी करत मी पाच लेअरपर्यंत पोहोचलो आहे. अजून मालक सापडत नाही. कारखाना लिलावात विकला जातो आणि कारखाना विकत घेतल्यावर काही दिवसात ८५ कोटींचे कर्ज कसे मिळते, याचा अभ्यास करत असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.