प्रतिनिधी / गगनबावडा
येत्या काही दिवसांत कापणीला आलेल्या भात पिकांत रानगव्यांचा शिरकाव वाढला आहे.मोठ्या प्रमाणात नुकसान होत असलेने जरगी ता.गगनबावडा येथील धनगरवाड्यावरील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.गतवर्षीप्रमाणे या वर्षीही गगनबावडा तालुक्यात धुवांधार पाऊस झाला.अतीपाऊस,दाट धुके जोराचा वारा त्यामूळे खरीप हंगामातील भात, नाचणी, भूईमूग, मिरची या पिकांची वाढ खुंटली आहे.माळरानातील जनावरांचा चारा कुजला आहे.गेल्या चार दिवसांत पावसाने उघडीप दिली आहे.
हिरव्या रंगाची पिके आता पिवळी धमक बनली आहेत.येत्या काही दिवसांत कापणीला येणार असल्याने शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे.अशातच गवा रेडे व अन्य रानटी श्वापदांचा शिरकाव वाढला आहे.जरगी येथील धनगरवाड्यावरील भात पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधुस केली आहे.यावर्षी लोकांच्या मागे संकटांचा ससेमिरा लागला आहे.अशातच रात्रंदिन राबून केलेली पिके उध्वस्त होत असलेने तोंडचे पाणी पळाले आहे. पांडुरंग बरगे,गणपती बरगे, धोंडीराम बरगे व अन्य शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले आहे.गगनबावडा वनविभागाने तत्परतेने पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी येथील शेतकऱ्यांतून होत आहे.